खामगाव : शेती मालकाला योग्य मोबदला देऊन ३ ते ५ वर्षापर्यंत ठोक्याने शेतीचा करार केल्या जातो. खरिपासोबत रब्बी हंगामाचाही ठोका घेतला जातो. पीक परिस्थिती पाहून ठोक्याचे भाव बदलत जातात. काही ठिकाणी संस्थानची तसेच वैयक्तिक स्वरूपाची शेती ठोका पद्धतीने देणे चालू आहे. शेतीचा दर्जा पाहून ठोका ठरविला जातो. साधारणत: ६ ते ७ हजार रुपये एकरप्रमाणे ठोक्याने शेती केली जाते; परंतु गेल्या तीन वर्षांंपासून निसर्गचक्रच पूर्णत: बिघडले असून, पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ऐन पेरणीनंतर पाऊस दडी मारत असल्याने शेतीपिकाला फटका बसत आहे. ठोक्याने शेती करून शेती मालकाला नगदी स्वरूपात मोबदला दिला जातो. यानंतर शेतीची नांगरणी, वखरणी, पेरणी, बी-बियाणे, खते, पेरणी, कीटकनाशक फवारणी तसेच पीक काढणीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत ठोक्याचा मोबदला व शेतीचा खर्च वजा करता शेती करणार्याला नफा होण्याची आशा असते; मात्र अत्यल्प पावसाने सारे गणित बिघडले आहे. गतवर्षी पेरणीनंतर पावसाने दीड ते दोन महिने दडी मारली होती. त्यामुळे शेतकर्यांना तोटा सहन करावा लागला. गतवर्षी ६ ते ७ हजार रुपये ठोका यावर्षी ३ हजारावर येऊन ठेपला. काही शेतकर्यांनी तर ठोक्याने शेती नकोच बाबा अशी भूमिका घेतली आहे. पावसाची अनियमित स्थिती राहिली तर शेती करण्यास शेतकरी सक्षम राहणार नसल्याची स्थिती निर्माण होणार आहे. बँकेचे कर्ज वा इतरत्र जुळवाजुळव शेतकर्यांना भेडसावत आहे. स्वत:च्या शेतीबरोबर ठोक्याची शेतीही धोक्याची झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ठोक्याची शेती झाली धोक्याची
By admin | Updated: July 18, 2015 02:10 IST