वसुलीअभावी बँकांचा श्वास कोंडलाखामगाव : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे भिजत घोंगडे शासनाने कायम ठेवल्याने द्विधा मनस्थितीत असलेल्या शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड करणे थांबवलेले आहे. त्यामुळे वसुलीअभावी बँकांची हालत खस्ता झाली असून त्यांचा श्वास कोंडला गेल्याचे चित्र दिसत आहे. मार्च-एप्रिल महिन्यात शेतकरी मागिल पीककर्जाचा भरणा करुन नवीन कर्ज काढण्याची तयारी करित असतात. याकरिता बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी असते. परंतु यावर्षी विरोधी पक्षांसह सत्ताधारी शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी रेटली जात आहे. शासनाने सुध्दा कर्जमाफी योग्यवेळी दिली जाईल असे म्हटलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात कर्जमाफीची आशा निर्माण झालेली असून कर्ज भरण्याकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. याचा फटका बँकांना बसला असून प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेत बोटावर मोजण्याएवढ्या शेतकऱ्यांनी पीककर्जाचा भरणा केलेला आहे. दुसरीकडे बँकांना आरबीआयकडून जाब विचारला जात असल्याने त्यांची अडचण झाली असून बँकांचा श्वास कोंडल्याचे दिसत आहे.
बोटावर मोजण्याएवढ्या शेतक-यांनी भरले पीककर्ज
By admin | Updated: April 23, 2017 01:14 IST