अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपयांचा अपव्ययमेहकर : तालुक्यात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. सदर पाणीटंचाई निवारण्यासाठी पंचायत समिती व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षी विविध योजनेद्वारे लाखो रुपये खर्च करण्यात येतो; मात्र अर्धवट कामे व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपये खर्च करूनही संबंधित गावात दरवर्षी पाणीटंचाई समस्या निर्माण होत असते. खर्च केलेल्या लाखो रुपयांचा काहीच फायदा होत नाही.मेहकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महाजल व पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत; मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे या योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मेहकर तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. सदर पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंचायत स्तरावरून विहीर अधिग्रहण, टँकर याची सुविधा करण्यात येते. ही सुविधा केवळ ३ ते ४ महिन्यांपर्यंत मर्यादित असते. या ३ ते ४ महिन्यात विहीर अधिग्रहण व टँकर यांच्यावर लाखो रुपये खर्च होतो; मात्र या लाखो रुपयांचा कायमस्वरूपी पाणी समस्या सोडविण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. त्या गावचा कायम स्वरूपी पाणीप्रश्न मिटवावा, यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत महाजल, भारत निर्माण राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना या लाखो रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. ज्या गावात या योजना राबविण्यात आल्या. त्यामध्ये बाऱ्हई, नांद्रा न.चायगाव, मोळा, उकळी, उसरण, साब्रा, कासारखेड, जयताळा, दादुलगव्हाण, गणपूर, रत्नापूर, जामगाव, खानापूर, मेळजानोरी आदी गावचा समावेश आहे. या विविध योजनेद्वारे त्या गावामध्ये नवीन विहिरी खोदणे, पाइपलाइन करणे, पंपघर बांधणे, मुख्य पाइपलाइन करणे, पाण्याची वितरण व्यवस्था करणे, विद्युत कनेक्शन घेणे, पाण्याची टाकी बांधणे आदी कामे करण्यात येतात. महाजल योजना, भारत निर्माण योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, अंतर्गत वरील १३ गावांमध्ये जवळपास २ कोटी ६७ लाख ४ हजार रुपये खर्च करण्यात आलेला आहे; मात्र लाखो रुपये खर्च करूनही या गावामध्ये दरवर्षी पाणी समस्या निर्माण होत आहे. ज्यावेळी संबंधित गावात या योजनेद्वारे कामे करण्यात आली. सदर कामे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने निकृष्ट झाली तर काही ठिकाणी अर्धवट कामे असल्याने सदर योजना अयशस्वी झाल्या आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही संबंधित गावात आज रोजीसुद्धा पाणीसमस्या कायमच आहे.
अर्धवट कामांमुळे योजना प्रभावित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 00:05 IST