सिद्धार्थ आराख /बुलडाणा: राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंतांच्या मानधनामध्ये राज्य शासनाने दीडपट वाढ करून सात कोटी ३२ लाख रुपयांची तरतूद केली असली तरी यातील केवळ ५0 टक्केच रक्कम अदा करावी, असे २५ फेब्रुवारीच्या शासन आदेशात म्हटले आहे. त्यातच सध्या मार्च महिन्याच्या ताळेबंदची प्रशासनाला घाई असल्यामुळे मागील सहा महिन्यांपासून मानधनाकडे डोळे लावून बसलेल्या वृद्ध कलावंतांना या महिन्यातसुद्धा मानधन मिळते किंवा नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मागील वर्षी १३ ऑगस्ट २0१४ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील मान्यवर साहित्यिक व वृद्ध कलावंतांच्या मानधनामध्ये दीडपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार राज्यातील २२ हजार ९५ वृद्ध कलावंतांना लाभ मिळणार आहे; मात्र आठ महिने उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती. २५ फेब्रुवारी २0१५ रोजी दीडपट केलेल्या मानधनवाढीवर ७ कोटी ३२ लाख ८२१५ रुपये रकमेची तरतूद करून ही रक्कम मार्च अखेर वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. ही तरतूद करताना या निर्णयात असेही म्हटले आहे की, चालु आर्थिक वर्षी सध्याच्या दराने वर्षभराच्या मानधनाची रक्कम अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे मानधनात जरी दीडपटीने वाढ झाली तरी मूळ तरतूद प्रचलित पद्धतीनुसार वितरीत होत असल्यामुळे सदर शासन निर्णयान्वये वाढीव ५0 टक्के रक्कम १५ ऑगस्ट २0१४ ते २८ फेब्रुवारी २0१५ या ६ महिने १७ दिवस कालावधीसाठी वितरीत करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
५0 टक्केच वाढीव मानधन मिळणार
By admin | Updated: March 27, 2015 01:42 IST