चिखली (जि. बुलडाणा): जून महिना कोरडा गेल्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर आपल्या भागात पुन्हा अशी वेळ उद्भवू नये तसेच पावसाच्या अनियमततेला मानवी हस्तक्षेप जबाबदार असल्याने किमान आपल्या परिसरात पावसाचा समतोल राखला जावा, यासाठी स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाने 'आधुनिक मेघ मल्हार' ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. याअंतर्गत पावसाच्या अनियमिततेस जे घटक कारणीभूत आहेत, त्यासंबंधी आवश्यक उपाय राबविण्याचा उपक्रम हाती घेतला असून, त्याची सुरुवात १७ जुलै रोजी करण्यात आली. सद्यस्थितीत काही प्रमाणात पाऊस कोसळत असला तरी अद्याप राज्यातील अनेक भाग कोरड्या दुष्काळाच्या छायेत आहेत. पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारल्याने पाण्याचे भीषण संकट उभे राहीले असून, शेतीचे प्रंचड नुकसान झाले आहे. हे संकट एका दिवसात उभे राहिले नसून, याकरिता कारणीभूत अनेक घटकांना निसर्गामध्ये होत असलेला मानवी हस्तक्षेप जबाबदार आहे. पूर्वीच्या काळी पावसाने उघडीप दिल्यास पाऊस पडावा यासाठी राग मेघमल्हार गायिला जायचा. या पार्श्वभूमीवर आजच्या या आधुनिक युगात पावसाचा समतोल राखायचा असल्यास ह्यआधुनिक मेघमल्हारह्ण ही अभिनव संकल्पना अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाने राबविण्यास सुरुवात केली आहे. आपल्या भागामध्ये पावसाचा समतोल राखण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाविद्यालयाच्यावतीने पावसाच्या अनियमिततेस जे घटक कारणीभूत आहेत व त्यांच्यावर जे उपाय केले पाहिजेत, असे उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयाच्या सर्व विभागामध्ये, मुला-मुलींचे वसतिगृह, कार्यालयांमध्ये इंधन बचत मोहीम हाती घेण्यात आली आहे तसेच ह्यरेन वॉटर हॉर्वेस्टींगह्ण, महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षरोपण, महाविद्यालय परिसरातील काडी कचरा, कागद आदी जाळून न टाकता त्यांच्यापासून कंपोस्ट खत तयार करून झाडांसाठी वापरणे, महाविद्यालयाच्या प्रत्येक घटकाने घरगुती कामासाठी सायकलचा वापर करणे, परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करणे आदी उपक्रमांच्या माध्यमातून इंधन व पाणी बचतीचा संदेश देण्यात येणार आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
पावसासाठी ‘आधुनिक मेघ मल्हार’
By admin | Updated: July 22, 2015 23:44 IST