ब्रह्मनंद जाधव / मेहकर (बुलडाणा)नापिकी आणि कर्जबाजाराला कंटाळून राज्यभर शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. प्रशासनही शेतकरी आत्महत्येचा अहवाल तयार करून त्यांना मदत देत आहे; परंतु आता शेतकर्यांच्या पाठोपाठ शेतमजुरांनीही आत्महत्येचा उंबरठा ओलांडला आहे. तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथील एका शेतमजुरानेच आत्महत्या केल्याने त्याला मदत देण्यासाठी नानाविध प्रश्न प्रशासनासमोर उभे ठाकले आहेत. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंब सैरभैर झाले असून, या कुटुंबीयाला मदतीत बसविण्यासाठी प्रशासनही विविध योजना उकरून काढत आहे.अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकर्यांच्या आत्महत्येचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या कुटुंबीयांसाठी शासनस्तरावरून विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. शेतकरी आत्महत्या होताच पूर्ण महसूल विभाग कामाला लागतो. त्यासाठी तहसीलदार, तलाठी सदर शेतकर्याच्या सातबारासारख्या विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करून, शेतकर्याच्या आत्महत्येचा अहवाल शासनाकडे पाठवितात. त्यानंतर काही दिवसातच आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबीयाला शासनाची आर्थिक मदतही मिळते. आता शेतकरी आत्महत्येच्या पाठोपाठ शेतमजुरांनीही आत्महत्या करण्यास सुरुवात केली आहे.
शेतमजुराच्या आत्महत्येने उभे केले अनेक प्रश्न
By admin | Updated: December 5, 2014 00:23 IST