खामगाव : ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. अमरावती परिमंडळातील पाचही जिल्ह्यांमध्ये महावि तरणकडून या संपर्क अभियानात प्रत्यक्ष ग्राहकांशी भेटून त्यांचे प्रश्न, तक्रारी व समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. तसेच त्याचवेळी निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याशिवाय तत्काळ कार्यवाहीसोबतच महावितरणच्या योजनांची माहिती व सद्यस्थिती ग्राहकांना सांगितली जाणार आहे. याबाबत महावितरणने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, अमरावती परिमंडळातील काही भागांमध्ये नुकत्याच ग्राहक सेवेसंदर्भात काही अप्रिय घटना घडल्या आहेत. यातील सहभागी काही निवडक कर्मचारी व बाहेरच्या दलालांनी केलेली ग्राहकांची दिशाभूल व वस्तुस्थिती सांगण्याकरिता महावितरणकडून ग्राहक संपर्क अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून पाचही जिल्ह्यातील प्रत्येक तालु क्यामध्ये नियोजित तारखेनुसार शिबिर घेण्यात येणार असून, त्याचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल. या अभियानातील संपर्क शिबिरांमध्ये जिल्ह्याचे मंडळाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता व जनमित्र उपस्थित राहतील. या कार्यक्रमांमध्ये ग्राहकांच्या तक्रारी, प्रश्न व समस्या जाणून घेऊन निराकरण करण्यात येईल. यामध्ये तक्रारीच्या स्वरूपानुसार जागेवरच तत्काळ कार्यवाही व कारवाईसुद्धा होणार आहे.
महावितरण करणार ग्राहकांशी संपर्क
By admin | Updated: July 6, 2015 23:55 IST