मोताळा, दि. १२- केवळ बारदाना नसल्याने तूर खरेदी बंद केल्याने मागील अनेक दिवसांपासून खाजगी व्यापारी शासकीय हमी भावापेक्षा, कमी भावाने तूर खरेदी करून शेतकर्यांची लूट करीत आहेत. तुरीची खरेदी थांबविण्यात आल्यामुळे शेतकरीवर्गात संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून तूर खरेदी सुरू करावी, या व इतर मागण्यांसाठी रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोताळा बसस्थानक चौकात तुरीची होळी करण्यात आली.मोताळा तालुक्यात तुरीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाले आहे. मात्र तुरीला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शासकीय हमीभावात तूर विक्री करण्यासाठी केवळ बारदान्याअभावी तुरीची खरेदी थांबविण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून तूर खरेदी करणे बंद आहे. त्यामुळे हजारो क्विंटल तूर जागेवर पडून आहे. पैशाची गरज पडली तर अनेक शेतकरी कमी भावात खाजगी व्यापार्यांना तूर विकून टाकत आहेत. या संधीचा फायदा घेत व्यापारी हमीभावापेक्षा कमी भाव देवून शेतकर्यांची लूट करीत आहे. त्यामुळे शेतकर्यांना कर्जमुक्ती व त्यांचा सातबारा कोरा व्हावा व नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू करावी, या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोशल मिडिया अध्यक्ष प्रदिप शेळके, युवा नेते सैय्यद वसिम यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते व शेतकर्यांनी १२ मार्च रोजी तूर पिकाची होळी केली व प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करीत घोषणाबाजी केली. यावेळी बोराखेडी पोलिसांनी आंदोलन कर्त्यांंना स्थानबद्ध करून नंतर सुटका केली. आंदोलन कर्त्यांंंमध्ये प्रदिप शेळके, सैय्यद वसिम, महेंद्र जाधव, विजय बोराळे, गजानन गवळी, सुधाकर काकर, नितीन देशमुख, विलास बावस्कर, विठठ्ल किन्होळकर, जुबेर पटेल, नारायण तायडे, मुकुंदा शिंबरे, संदीप नवले, रशीद पटेल, अनिसखाँ पठाण, दिपक जाधव, जाकीर खान आदींचा समावेश होता.
मोताळय़ात झाली ‘तुरीची होळी’!
By admin | Updated: March 13, 2017 02:26 IST