साखरखेर्डा : मृगनक्षत्र सुरु व्हायला जेमतेम तीन आठवड्याचा वेळ असतांना साखरखेर्डा परिसरात बुधवारी दुपारच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी बांधवांपुढे पुन्हा एकदा आसमानी संकट उभे ठाकले आहे. यंदाचा खरीप हंगाम जवळ आला आहे. शेतकरी बांधव शेतीच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. गत तीन महिन्यात परिसराला अनेकदा अवकाळी पावसाने आणि वादळी वार्यासह गारपीटीने झोडपले. त्यामुळे रब्बीच्या पिकांसहीत फळबागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. यामधील नुकसानग्रस्तांना अद्याप आर्थिक मदतीची प्रतिक्षा आहे. आसमानी संकटामधून सावरायलाही त्यांना वेळ मिळत नाही. त्यातच पुन्हा एकदा वादळीवार्यासह विजेचा कडकडाटासह तासभर मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे परिसरातील मोठमोठी वृक्षही उन्मळून पडली होती. साखरखेर्डा-शेंदुर्जन मार्गावर तर पाच ते सहा मोठमोठी वृक्ष वादळी वार्याने पडली होती. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली होती. युद्ध पातळीवर मोठमोठी झाडे हटविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे संतोषराव मोरे करीत होते. तसेच विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता. अचानक आलेल्या या वादळीवार्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. यंदा उन्हाचा पारा क्वचित ४0-४१ डिग्री सेल्सीअस पर्यंत पोहचला. त्यामुळे कडाक्याचा उन्हाळा जाणवला नाही. ८-१५ दिवसांपासून येणारे आभाळ आणि अवकाळी पाऊस त्यामुळे यंदा पावसाळा कसा असेल, पाऊस केव्हा सुरु होईल? असे अनेक प्रश्न बळीराजाची चिंता वाढवित आहे. या बदलत्या हवामानामुळे खरीप पिकाचे नियोजन कसे करावे, कोणते पीक घ्यावे, याबाबत शेतकरीबांधव संभ्रमावस्थेत आहे.
विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस
By admin | Updated: May 15, 2014 00:39 IST