संग्रामपूर (जि. बुलडाणा): तालुक्यातील काथरगाव येथील शंभर शेतकर्यांनी नामधारी ७५0 या कंपनीचे टरबूज बियाण्यांची लागवड केली होती. हे बियाणे निकृष्ट निघाल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला, टरबूज फळ हे पूर्णपणे भरले नाही, तसेच त्याची वाढही झाली नाही या प्रकाराबाबत शेतकर्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ही तक्रार केली; मात्र त्याची दखल न घेतल्याने अखेर मंगळवारी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांसह शेतकर्यांनी सदर बियाण्यांच्या पाकिटाची होळी केली व टरबूज रस्त्यावर फेकून आपला संताप व्यक्त केला.संग्रामपूर येथे मंगळवारी झालेल्या या आंदोलनात शेतकर्यांसह युवक काँग्रेस व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्तेसुद्धा सहभागी झाले होते. तालुक्यातील काथरगाव येथील शेतकर्यांनी २२ एकर क्षेत्रात जानेवारी महिन्यामध्ये नामधारी ७५0 या टरबूज बियाण्यांची लागवड केली होती; मात्र जानेवारीत बियाणे लागवड केल्यानंतरही चार महिने उलटले, तरी या टरबुजाच्या वेलाला टरबूज न लागल्याने तसेच लागली तर फळांचा दर्जा व आकारमानावर फरक पडला. त्यामुळे फळाचे वजन २00 ते ४00 ग्रॅमच असल्यामुळे व फळाचा आकार बेडौल असल्यामुळे संबंधित शेतकर्यांनी नामधारी ७५0 कंपनीकडून नुकसान भरपाई द्यावी, करिता कंपनीच्या रिजनल मॅनेजरकडे मागणी केली, तसेच तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडेसुध्दा टरबूज बियाणे बोगस निघाल्याची तक्रार केली. यानंतर शेतकरी तक्रार निवारण समितीने बियाणे बोगस व सदोष असल्याचा अहवाल पंचायत कृषी अधिकार्याकडे दिला; मात्र अहवाल प्राप्त होऊनही कंपनीकडून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे अखेर शेकडो शेतकर्यांनी व युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी तसेच संभाजी बिग्रेडच्या पदाधिकार्यांनी १९ एप्रिल रोजी बियाण्यांच्या पाकिटाची होळी करून तसेच टरबूज रस्त्यावर फोडून अभिनव आंदोलन केले.
निकृष्ट टरबूज बियाण्यांची होळी
By admin | Updated: April 20, 2016 02:04 IST