शेतकऱ्यांचे २ लाख ८० हजारांचे नुकसान
लोणार: तालुक्यातील खुरमपूर शिवारातील शेतातील पाच गोठ्यांना १५ एप्रिल रोजी दुपारी अचानक आग लागली. यात बैलगाडी, पाइप, वैरण व शेतीउपयोग साहित्य जळून खाक झाले. या आगीमुळे गावातील पाच शेतकऱ्यांचे २ लाख ८१ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील खुरमपूर शिवारातील तान्हाजी फुला राठोड, विठ्ठल फुला राठोड, अर्जुन फुला राठोड, दशरथ हरसिंग राठोड, श्रीराम लिंबाजी टेकाळे या शेतकऱ्यांचे शेतात एकमेकालगत पाच गोठे होते. दरम्यान, १५ एप्रिल रोजी दुपारी एका गोठ्याला आग लागली. हवेमुळे आग पसरून पाचही गोठे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीमध्ये बैलगाडी, स्पिंक्लर पाइप, धान्य, वैरण व शेतातील इतर साहित्य जळून खाक झाले. यात सदर शेतकऱ्यांचे २ लाख ८१ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून तलाठी आर.व्ही. भाकडे यांनी नुकसानाचा पंचनामा केला. यावेळी ग्रामसेवक ए.पी. आघाव, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व गावकरी उपस्थित होते.