मेहकर : राज्य परिवहन महामंडळाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार्या अनेक एसटीबसमधील प्रथमोपचार पेट्या गायब असल्याचे निदर्शनास आले आहे. तर ज्या बसमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आलेल्या आहेत, त्यांचीही दुरवस्था असून, त्यातील औषधेही गायब आहेत. बसेसमधील अपघात कळस गाठत असल्याने एसटीतील प्रथमोपचार पेटीला आज उपचाराची गरज निर्माण झाली आहे. जनसामान्यांसाठी ह्यगाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटीह्ण ही ब्रिदावली घेऊन परिवहन महामंडळाच्या एसटीचा प्रवास अविरत सुरू आहे. सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणजे एसटी बस; प्रवासासाठी गावागावांतील प्रवाशांची आजही एसटीवरच मदार आहे. एसटीला खासगी वाहनांची समांतर यंत्रणा उभी राहत असली, तरीही एसटीसारखा आरामदायी प्रवास नसल्याने अनेक प्रवाशांची आजही एसटीवरच ओढ आहे. एस.टी. चा प्रवास सर्वात सुखकर, त्यामुळे कितीही दुरवरचा प्रवास असेल तर प्रवासी एस.टी. बसला पसंती देतात. शहर तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला जोडणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो बसेस सद्यस्थितीत राज्यभरातील रस्त्यांवर धावत आहेत. अपघाताच्या वेळी तातडीने प्रथमोपचार करता यावा, याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील चालकाच्या केबिनमध्ये प्रथमोपचारपेटी असते; मात्र एसटीमधील प्रथमोपचार पेटीकडे चालक, वाहक किंवा आगारातील कर्मचारी कुणीही लक्ष देत नसल्याने प्रथमोपचार पेटीलाच प्राथमिक उपचाराची गरज भासत आहे. काही एसटीबसची पाहणी केली असता बहुतांश एसटीबसमधील प्रथमोपचारपेटीच गायब असल्याचे आढळून आले. तर ज्या बसमध्ये प्रथमोपचार पेटी बसविलेली होती, त्या पेटीमध्ये औषधे किंवा प्राथमिक उपचाराचे कुठलेच साहित्य दिसून आले नाही. अपघात घडताच प्राथमिक उपचार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचेपर्यंत आपल्या प्राणालाही मुकावे लागते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एसटीतील प्रथमोपचाराचे तीनतेरा वाजत आहेत.
एसटीतील प्रथमोपचार पेटीला उपचाराची गरज
By admin | Updated: May 19, 2014 00:36 IST