जयदेव वानखडे/ जळगाव जामोद : मृग नक्षत्राच्या मृहूर्तावर पाऊस आल्याने काही शेतकर्यांनी केलेल्या पेरण्या साधल्या. पिके वर आली; मात्र त्यानंतर पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या उलटल्या आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील अशा शेतकर्यांनी पेरलेले शेत ह्यवखरणेह्ण सुरू केले असून, त्यांनी केलेला पेरणीचा सर्व खर्च वाया गेला आहे. आता दुबार पेरणीचे संकटही त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे. तालुक्यात २२ हजार हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्या सर्वच पेरण्या पावसाअभावी धोक्यात आल्या आहेत. १२ जूननंतर तालुक्यात पाऊस नसल्याने तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, ज्वारी ही सर्वच पिके धोक्यात आली आहेत. आसलगाव शिवारातील मनोरमा इंगळे यांच्या मालकीच्या सहा एकर शेतातील तूर, सोयाबीन सुकल्यामुळे सोमवारी त्यांनी वावरात वखर घातला. अशी स्थिती सर्वत्र येण्याची शक्यता आहे. खेर्डा येथील शेतकरी गोपाल उमरकर, जळगाव जामोदचे समाधान नानकदे, आसलगावचे पुरुषोत्तम भुसारी अशा अनेक शेतकर्यांनी पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागणार असल्याची भीती व्यक्त केली. शेती वखरल्यानंतर पेरणीचा सर्व खर्च वाया जात असल्याने शेतकर्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकणार आहे.
शेतक-यांनी ‘वखरले’ वावर!
By admin | Updated: July 7, 2015 00:04 IST