जयदेव वानखडे / जळगाव जामोदमृग नक्षत्र संपले तरी मान्सुनचा पाऊस आला नाही म्हणून शेतकरी हवालदिल होवून आता पुढे काय पेरायचे ह्या चिंतेत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सध्या तरी चिंता करण्याचे कारण नाही. आपत्कालीन पीक नियोजन करून परिस्थितीला सामोरे जाणे हेच हितावह आहे. कृषी हवामान शास्त्रीय दृष्टीकोनातून विदर्भ विभाग प्रामुख्याने तीन हवामान उपविभागांमध्ये विभागला गेलेला आहे. हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश आणि जास्त पावसाचा प्रदेश असे असले तरी सार्वत्रिक स्वरूपाच्या कमी दाबाच्या पट्टयापासून मिळणारा पाऊस हा संपूर्ण विदर्भात एकाचवेळी पडतो. पावसाच्या प्रमाणात मात्र बदल असतो. कमी दाबाचा पट्टा जेव्हा संपूर्ण विदर्भावर नसतो तेव्हा मात्र विदर्भातील पावसाच्या प्रमाणात जिल्हा तसेच तालुकानिहाय मोठय़ा प्रमाणावर बदल आढळून येतात. नियमित पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा साधारण तीन दिवसात संपूर्ण विदर्भात पाऊस पोहचतो. सर्वसाधारणपणे ११ ते १७ जून दरम्यान विदर्भात नियमित मोसमी पाऊस येतो. परंतु यावर्षी नियमित वेळेवर मोसमी पावसाला सुरूवात झाली नाही. पावसाळा जर एक ते दोन आठवडे उशीरा सुरू म्हणजेच (२५ जून ते १ जुलै) पर्यंत झाला तर पीक नियोजनात कोणतेही बदल करण्याची गरज नसते म्हणून शेतकरी बंधुंनी पाऊस सुरू होण्याची वाट पाहून पेरणीयोग्य पाऊस १ जुलैपर्यंत झाल्यास जी पीके आपण घेणार आहोत त्या पिकांची विद्यापीठाचे शिफारशीनुसार पेरणी करावी त्यात बदल करण्याची गरज नाही. परंतु १ जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास पीक नियोजनात काही बदल करून पेरणी करावी लागेल जेणेकरून अशा परिस्थितीतही आपण चांगले उत्पादन घेऊन परिस्थितीवर काही प्रमाणात मात करण्यात यशस्वी होवून परिस्थिती सुसह्य होईल. अशा परिस्थितीत शेतकर्यांनी आपत्कालीन पीक नियोजन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र जळगाव जा. मार्फत करण्यात आले आहे. पाऊस उशिराने आला तरी पीक नियोजन बदल करून चांगले उत्पन्न घेता येते. तर १५ जुलैपर्यंत पेरणीचा योग्य काळ आहे.
शेतकर्यांनो, पावसाळा लांबला; चिंता नाही!
By admin | Updated: June 25, 2014 00:02 IST