अनिल गवई /खामगाव: एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत शहराच्या विविध भागात घरकुलांची उभारणी करण्यात आली. या घरकुलांमध्ये शहरातील काही नागरिकांनी बेकायदेशीर ताबा बळकावित, अतिक्रमण केले. दरम्यान, या अतिक्रमकांविरोधात पालिकेने आता जोरदार मोहीम उघडली असून, घरकुल खाली न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची नोटीसही दिली आहे. तथापि, गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे कब्जा करणार्यांवर कारवाई करताना पालिकेची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येते. एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत नगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रारूप यादी मंजूर केली. त्यावेळी १ हजार ४३0 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १४३0 लाभार्थी असल्याचेही स्पष्ट झाले होते. त्यापाठोपाठ पालिकेने शहराच्या विविध भागात १४३0 घरकुलांची निर्मितीही केली. या उभारण्यात आलेल्या घरकुलांपैकी ९२१ घरकुल पालिकेच्या ताब्यात असून, सर्व्हे क्रमांक ५८ मधील ५0९ घरकुल अद्याप पालिकेच्या अखत्यारित आलेली नाहीत. दरम्यान, पालिकेने यापैकी १६६ लाभार्थ्यांना घरकुलाचा ताबाही दिलेला आहे. उर्वरित लाभार्थी हे घरकुलामध्ये राहण्यास गेलेच नाही. या गोष्टीचा फायदा घेत, शहरातील शंकर नगर, चांदमारी नजिकचा शेलोडी परिसर आणि रावणटेकडी भागातील घरकुलांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांनी अनधिकृत कब्जा केला आहे. या पार्श्वभूमीवर या या घरकुलांमध्ये राहण्यास लाभधारक उत्सुक नसल्याने पालिकेने त्यांच्याकडून यादीतून वगळण्यासाठी सहमती पत्र घेत नव्याने सर्वेक्षण करीत लाभार्थ्यांंची निवड केली; मात्र आता २३ जानेवारी रोजी दक्षता व संनियत्रंण समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत योजनेतील जुन्याच लाभार्थ्यांंना घरकुलांचा लाभ देण्यात यावा, तसेच त्यांना या ठिकाणी राहण्यासाठी प्रवृत्त करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाची तारांबळ उडाली असून, आता ही घरकुल खाली करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे.
अतिक्रमकांनो, घरकुल खाली करा!
By admin | Updated: February 17, 2016 02:15 IST