देऊळगावराजा (जि. बुलडाणा), दि. ९ : तालुक्यातून गेलेल्या जालना देऊळगावराजा ते चिखली या ८0 कि.मी.च्या राज्य महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठय़ा खड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनचालक व प्रवाशी अत्यंत त्रस्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. चौपदीकरणाच्या नावाखाली या राज्य महामार्गाचे नवनिर्माणाचे काम भिजत घोंगडे बनले आहे. चौपदरीकरण होणार असल्याने तत्कालीन कंत्राटदारांनी पुर्वीचा रस्ता पुर्णपणे उखडून टाकला. जे काम त्या काळात झाले ते कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने महिनाभरात गिट्टी बाहेर आली. अशा अनेक अडचणी उभ्या राहिल्याने चौपदरीकरण फक्त म्हणण्यापुरते राहिले आणि पाच ते सहा वर्षाच्या काळात शेकडो निष्पापांना या राज्य महामार्गावर जीवाला मुकावे लागले. प्रारंभी चौपदीकरणाच्या कामासाठी कंत्राटदार आले. कामही सुरू झाले. पण दर्जा निकृष्ट दिसून आल्याने काम बंद पडले. ते आजतागायत बंदच आहे. पुढे हा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत करण्यात आला. अद्यापही या रस्त्यावर काम सुरू झालेले नाही आणि हा राज्य महामार्ग हस्तांतरीत झाल्याच्या नावाखाली राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर आम्हाला आता काम करता येत नसल्याचे सक्षम? कारण देत हात वर केल्याने या राज्य महामार्गाच्या दयनीय अवस्थेला कुणीच वाली नसल्याचे दुर्देव समोर येत आहे.
राज्य महामार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य
By admin | Updated: August 10, 2016 00:07 IST