सोनाळा : परिसरात झालेल्या वादळामुळे वीज खांब कोसळल्याने गेल्या पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे सुमारे ४३५ हेक्टर बागायती क्षेत्रावर लागवड केलेल्या कपाशीच्या पिकाला पाणी देता येत नसल्याने अंकूर कोमेजत असून दुबार पेरणीचे सावट निर्माण झाले आहे.
त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोनाळा व परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे दीड तास सोसाट्याच्या वार्यासह वादळ झाले. या वादळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील झाडे कोळमडून पडली. तसेच विजेचे खांब व त्यावरील तार तुटल्याने सोनाळा भाग १ व २, पिंगळी जहांगीर, बोरखेड शिवारातील शेती पंपाला होणारा विद्युत पुरवठा बंद झाल्याने चारशे पासष्ठ हेक्टर बागायती शेती प्रभावीत झाले आहे. पेरलेल्या कपाशीच्या बिजवाईचे अंकुर कोमेजण्याची भीती शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे. नैसर्गिक वातावरणातील पावसावर अवलंबून न राहता व कपाशीचे भरघोस घेण्याकरिता दरवर्षी सोनाळा परिसरातील सोनाळा, सायखेड, पिंगळी, सगोडा, बोरखेड, बावनबीर शिवारातील शेतकरी वर्ग मृग नक्षत्रात बागायती कपाशीची पेरणी करतात. यावर्षी ही परिसरातील शेतकर्यांनी मृगनक्षत्रात चारशे पासष्ठ हेक्टर बागायती क्षेत्रावर पेरणी केली आहे. यामध्ये काही शेतकर्यांच्या बागायती मधील कपाशी बिजवाई जमिनीवर निघाली तर काहीने अंकुर बाहेर काढले आहेत. ११ जून रोजी वादळाने थैमान घातले होते. परिसरातील शेतातील खांब तुटले तर काहीचे तारही तुटून पडले आहेत. यामुळे शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्याने बागायती कपाशीला पाणी देणे बंद केले आहे. गेली चार दिवस उलटून गेली आहेत तरीही वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा सुरु केला नाही. वादळी पावसाचा काही प्रमाणात जमिनीत ओलावा टिकून आहे तर वरुन सूर्यप्रकाश आग ओकत असल्याने पेरलेल्या बागायती कपाशीच्या बिजवाईचे तीन-तेरा वाजत असल्याचे चित्र सर्वदूर परिसरात आहे. बर्याच शेतकरीवर्गाने महागाईची बिजवाई पेरलेली असल्याने चांगले उत्पादन घेण्याची स्वप्ने धुळीत मिळत आहेत.