डोणगाव : येथून जवळच असलेल्या ग्राम गोहोगाव दांदडे येथील स्वस्तधान्य दुकानदार वाटपात मनमानी करुन एक महिना आड माल वाटप करुन अन्नधान्याचा अपहार करीत असल्याची तक्रार गोहोगाव येथील विश्वनाथ शेकू जमवे यांच्यासह १00 गावकर्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. त्यांनी तक्रारीत स्वस्त धान्य दुकानदार प्रभाकर भिकाजी दांदडे हे दोन रुपये किलोचे गहू तीन रुपये किलो तर तांदूळ चार रुपये किलोने विकत असून, अन्नसुरक्षा योजनेत येणार्या मालातसुद्धा भ्रष्टाचार होत आहे. एक महिना आड मालाचे वाटप केले जाते. तर एक महिन्याचा माल काळ्या बाजारामध्ये विकत आहे. सदर दुकानदार माल वाटपाबाबत दवंडी देत नसून, पोलिस पाटील व सरपंच यांनासुद्धा कल्पना देत नाही. दुकानवर भावफलक नाही, जास्त दराने माल विक्री करुन कोर्या बिलबुकावर सह्या घेणे, १७ रुपये किलो गहू विकणे व १0 रुपये किलो तांदूळ विकत असून, कार्डधारकांसोबत अरेरावीची भाषा वापरणे, मागील काही दिवसात कार्डधारकांकडून नवीन व विभक्त कार्ड बनवून देण्यासाठी ३५0 रुपये घेतले असून, अद्यापपर्यंत एकही कार्ड वितरित झाले नाही. त्यामुळे कार्डधारक त्रस्त झाले आहेत. याची सखोल चौकशी करण्यात यावी, अन्यथा सर्व कार्डधारक उपोषण करुन आंदोलन करतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना ग्रामस्थांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.
गोहोगाव येथे धान्य वितरणात अपहार
By admin | Updated: July 10, 2014 01:32 IST