धाड : धाडमध्ये महाराष्ट्रदिनी ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी गावातील साधारण ३०० च्या वर महिलांनी एकत्रित येत आजची ग्रामसभा गाजवली. देशी दारू दुकान गावाच्या हद्दीबाहेर काढण्यासाठी ग्रामपंचायत येथे आज ग्रामसभेत ठराव पारित करुन गावातील महिलांनी यासंदर्भात एक निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.निवेदनात येत्या १५ दिवसात सदर दारू दुकान गावातून हद्दपार न केल्यास आंदोलनाचा इशाराही याठिकाणी देण्यात आला आहे. त्यासह गावहद्दीत यापुढे कुठल्याही विदेशी वा देशी दारूचे दुकानास परवानगी न देण्याची मागणी केली आहे. यावेळी साधारण: ३०० महिलांनी आपला मोर्चा हा पोलीस स्टेशनकडे वळवत येथील ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांनाही निवेदन दिले. निवेदनावर गावातील वंदना अनिल घाडगे, सविता भरत उबाळे, दुर्गा रामेश्वर मोहिते, रीना शेषराव ठाकरे, गीता प्रकाश राऊत, सीमा अनिल कुटे, पूजा शिवाजी गुजर, कविता अरविंद गुजर, निर्मला विष्णू वाघुर्डे, अनसूया सुनील आपार, साबीराबी बागवान यांच्यासह जवळपास २८० महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्वत्र राज्यमार्गावरील मद्य विक्रीची दुकाने हद्दपार करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाने दारू व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे. आता ग्रामीण भागातही गावागावातून असलेली दारूची दुकाने गावाबाहेर हद्दपार करण्यासाठी महिला वर्ग पुढाकार घेत आहे. १ मे रोजी महाराष्ट्रदिनी गावागावातून होणाऱ्या ग्रामसभेत उभी बाटली आडवी करण्याचा संकल्प ग्रामीण महिलांनी केल्याने दारूची बाटली हद्दपार होणार काय? हा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. देशी दारूचे दुकान गेल्या अनेक वर्षांपासून गावातील मध्यवर्ती भागात सुरू आहे. महामार्गावरील बंद केलेल्या दारूच्या दुकानांप्रमाणे गावाचे मध्यवर्ती भागातील दारूचे दुकान हद्दपार करण्यासाठी धाड येथील महिलांनी पुढाकार घेतला.
गावातील दारुचे दुकान हद्दपार करा!
By admin | Updated: May 1, 2017 23:30 IST