जळगाव जामोद : सुनगाव रोडवर खामगावकडे खामखेड शिवारामध्ये गजानन खिरोडकार यांच्या शेतात कामावर गेलेली सीमा समाधान तायडे (वय १८) राहणार भीमनगर जळगाव ही तरुणी पाणी पिण्यासाठी विहिरीवर गेली असता, पाणी काढताना पाय घसरुन विहिरीत पडली, तर बाजूच्या शेतात काम करणारा राहुल रमेश बावस्कार (वय २५) रा.खेर्डावेस जळगाव हा वाचविण्यासाठी गेला असता दोघांचाही विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २५ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.खिरोडकर यांच्या शेतात बाया कामासाठी होत्या. त्यातच सीमासुद्धा मजुरीकरिता आली होती. तर पिण्यासाठी पाणी काढत असताना पाय घसरुन ती ८० फूट विहिरीत कोसळली. महिलांचा आरडा ओरडा ऐकून बाजुच्या शेतामधून बचावासाठी आलेल्या राहुलने विहिरीत उडी घेतली; मात्र विहिरीला पाणी असल्याने दोघांचाही मृत्यू झाला. याबाबत जळगाव पोलिसांनी जाफौ १७४ कलमान्वये मर्ग दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भंडारी, पोहेकॉं व्ही.आर.राठोड हे करीत आहेत.बोहल्यावर चढण्यापूर्वीच राहुलवर काळाची झडपयातील मृत राहुल बावस्कार या तरुणाचे ७ मे रोजी लग्न ठरले होते. त्यामुळे संसाररुपी बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे जळगावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विहिरीत पडून दोघांचा मृत्यू
By admin | Updated: April 26, 2017 00:36 IST