चिखली विधानसभा मतदारसंघावर प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा प्रभाव असल्याचे मानले जाते; परंतू हा समज खोडून काढून काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांनी लिलया आमदारकी मिळविली; मात्र अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघामध्ये आघाडी घेतल्याने, काँग्रेसची कसोटी लागणार आहे.
लोकसभेत शिवसेनेला मिळालेली आघाडी, भाजपकडे झालेली उमेदवारांची गर्दी, महायुतीमधील स्वाभिमानी संघटनेने फुंकलेला बिगुल, अनेक अपक्षांनी निवडणुकीसाठी कसलेली कंबर, अशा स्थितीत चिखलीत सध्या इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झालेली आहे. आ.बोंद्रे यांनी आपल्या आमदारकीच्या कालावधीमध्ये ह्यसलाम बळीराजाह्णच्या माध्यमातून परिसरातील शेतकर्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. अनुराधा मिशनच्या माध्यमातून रूग्णसेवेचे सामाजिक उपक्रम राबविले. याशिवाय पांदन रस्ते, भूमीपुत्र ग्रामदरबार, भगीरथ जलसंजीवनी प्रकल्प यासारख्या विविध कार्यक्रमांनी मतदारसंघावर वेगळी छाप टाकली. त्यांचे अनेक प्रकल्प राज्यासाठी पथदश्री ठरले; परंतू या सर्व उपक्रमांवर जिल्हा सहकारी बँकेचे कर्जप्रकरणाने पाणी फेरले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकरांनी अक्षरश: डफडे वाजवून त्यांना त्रस्त करून सोडले. आ. बोंद्रे यांनी या सर्व प्रकरणांमधून आपला विकासाचा वारू अलगद बाजुला काढला आणि पुन:श्च दौडत ठेवला; मात्र लोकसभा निवडणुकीत चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे खा.प्रतापराव जाधव यांना तब्बल ३0 हजारांचे मताधिक्य मिळाल्याने बोंद्रे यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहीले. अशातच काँग्रेसच्या काही शिलेदारांनी पक्षातून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेसची स्थिती बिकट असल्याचे दिसून येत आहे. भाजपाची स्थिती याउलट आहे. लोकसभेत महायुतीला मिळालेली आघाडी पाहून अनेक इच्छूक उमेदवार भाजपाच्या आखाड्यात शड्डू ठोकून उभे आहेत. त्यामध्ये भाजपाकडे प्रदेश कार्यकारीणीचे सदस्य अँड. विजय कोठारी, जिल्हा सरचिटणीस सुरेशआप्पा खबुतरे, हभप प्रकाशबुवा जवंजाळ, विश्व हिंदू परिषदेचे सतीष गुप्ता, संजय चेके पाटील, श्वेता महाले, जि.प. सदस्य श्याम पठाडे, एकनाथ जाधव, ङ्म्रीराम सपकाळ, दत्ता पाटील, माजी जि. प. सदस्य देविदास जाधव अशी भलीमोठी इच्छुकांची मांदीयाळी पहावयास मिळते. महायुतीतील मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना हा मतदारसंघ महायुतीमध्ये आपल्यालाच सुटणार असा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनीही मतदारसंघात जोरदार मांड ठोकली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव चिखलीची जागा स्वाभिमानीने मागीतल्याने ही जागा कदाचित त्यांना सुटूही शकते. तसे झाल्यास भाजपच्या इच्छूकांची गोची होणार आहे. याशिवाय ह्यआता नाही जनशक्तीची माघारह्ण असा नारा देत कपिल खेडेकरांनी त्यांच्या काकू रेखाताई खेडेकरांच्या राजकारणाला घरातूनच सुरूंग लावला आहे. कपिल खेडेकर हे माजी आमदार रेखाताई खेडेकर यांचे पुतणे आहेत. जि.प.निवडणूकीतील परावभवानंतर जनशक्ती संघटना स्थापन करून मतदारसंघात या संघटनेची पाळेमुळे त्यांनी पसरवून ठेवली आहेत. याच कार्यकर्त्यांच्या भरवशावर कपिल खेडेकरांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने विधानसभा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून रेखाताईंची उमेदवारी निश्चित होवू शकते. लोकसभेसारखा हिरमोड झाल्यास रेखाताई अपक्ष निवडणूक लढविण्याच्या मनस्थितीत आहेत. संपूर्ण मतदारसंघामध्ये रेखाताईच आ. बोंद्रे यांना टक्कर देऊ शकतात, असा विश्वास मतदारसंघात आहे. याच विश्वासाच्या आधारावर रेखाताई पुन:श्च अपक्षची वाट चोखाळत आहेत. लोकसभेतील आघाडीमुळे राजपूत समाजाचे बलाढय़ नेते, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.प्रतापसिंग राजपूत यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. ही जागा शिवसेनेला मिळावी असा आग्रह त्यांनी पक्षाकडे धरल्याचे समजते. गत निवडणुकीत अचानकपणे एक्झीट घेतलेल्या बसपाचा हत्ती यावेळी सावधपणे आपले भरभक्कम पाय रोवण्याच्या स्थितीत आहे. याशिवाय भारीप- बमसं, समाजवादी पक्ष, एमआयएम यासारखे उपद्रवमूल्य ठेवून आहेत. त्यांच्यासोबतीला अँड.दत्ता भुतेकर, गणेशराव बाहेकर या अपक्ष उमेदवारांचीही भर पडणार आहे. या धामधुमीत मनसेदेखील आपले अस्तित्व दाखविण्याच्या तयारीत आहे.