ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 6 - जिल्ह्याला इंग्रजकालीन तलावाने एक वैभव प्राप्त करून दिले; मात्र जिल्ह्यातील इंग्रजकालीन तलावाची अत्यंत दूरवस्था झाली आहे. बुलडाण्यातील इंग्रजकालीन संगम तलावाचे सौंदर्य सध्या काटेरी झुडूपात अकडले असून तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात इंग्रजाच्या काळात अनेक तलाव तयार करण्यात आले होते. इंग्रजांनी १८६७ साली थंड हवेच्या बुलडाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त करून दिला. त्यावेळी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शहराच्या चारही बाजुला तलावाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये संगम तलाव, तार तलाव, लेंडी तलाव व सरकारी तलाव यांचा समावेश
आहे. अनेक वर्ष बुलडाण्याला इंग्रजकालीन संगम तलावातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. तर लेंडी तलाव व तार तलाव यांचा वापरासाठी व कपडे धुण्यासाठी वापर करण्यात येत होता. परंतु स्वातंत्र्यानंतर या चारही तलावाला अवकळा प्राप्त झाली. नगरपालीकेच्या दुर्लक्षामुळे तार तलाव व लेंडी तलाव नामशेष झाले. जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला इंग्रजकालीन संगम तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. संगम तालवाचे सौंदर्य सध्या काटेरी झाडात दडले आहे. तलावाला काटेरी झुडपांचा विळखा निर्माण झाला असून, यातील पाणीही हिरवे पडत आहे. त्यामुळे या तलावाच्या काठावरिल झुडूपे काढून तलावाचे सौंदर्यीकरण करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
तलाव बनला मृत्यूचा सापळा
गेल्या काही वर्षापासून बुलडाण्यातील इंग्रजकालीन संगम तलामाध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. हा तलाव मृत्यूचा सापळा बनत आहे. तलावात होणाऱ्या आत्महत्यांमुळे तावाचे संरक्षण उव्हाट्यावर येत आहे. याकडे लक्ष देऊन तलावाला संरक्षण कठडे बसविणे गरजेचे आहे.