चिखली ( जि. बुलडाणा) : पेरणीचे दिवस तोंडावर आले असतानाही तालुक्यातील बँकांनी अद्यापपर्यंत पीककर्जाचे पुनर्गठण केलेले नाही. तर याबाबत शासनाचे सक्तीचे आदेश असतानाही शहरातील स्टेट बँकेत कर्ज पुनर्गठणास टाळाटाळ होत असल्याने ५ जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्रस्त शेतकर्यांसह स्टेट बँकेतील व्यवस्थापकांच्या दालनात ठिय्या दिला व व्यवस्थापकास घेराव घालण्यात आला. याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने येत्या ८ जूनपासून पुनर्गठणास सुरुवात करण्याचे आश्वासन संबंधितांनी दिले. यावर्षी तत्काळ पीक कर्जाचे वाटप करण्याबाबत जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी बँकांना आदेशीत केले आहे; मात्र त्याकडे तालुक्यातील राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांकडून होत आहे. तर पीक कर्जासाठी शेतकरी बँकांचे उंबरठे झिझवून मेटाकुटीला आला आहे. येथील स्टेट बँकेत कर्ज पुनर्गठणासाठी येणार्या शेतकर्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परतून लावण्यात येत आहे. याबाबत निराश झालेल्या शेतकर्यांनी याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालय गाठले व बँकेच्या अनागोंदी कारभाराची जाणीव करून दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वाभिमानीचे भारत वाघमारे व विनायक सरनाईक त्रस्त शेतकरी व कार्यकर्त्यांसह स्टेट बँकेत धडकले व व्यवस्थापक तागडे हे कक्षात उपस्थित नसल्यामुळे याठिकाण ठिय्या देण्यात आला. दरम्यान, बँकेत हजर झालेल्या व्यवस्थापकास स्वाभिमानीचे पदाधिकारी व शेतकर्यांनी घेराव घालून कर्ज पुनर्गठणाबाबत धारेवर धरले. तसेच जोपर्यंत पीककर्जाचे पुनर्गठण होत नाही, तोपर्यंंत बँकेतच ठिय्या देण्याचा पावित्रा घेतल्याने व्यवस्थापक तागडे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून येत्या सोमवारपर्यंत पुनर्गठणाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
पीककर्ज पुनर्गठणास स्टेट बँकेची टाळाटाळ
By admin | Updated: June 6, 2015 00:55 IST