जळगाव जामोद : शालेय विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयामधून शैक्षणिक कागदपत्रे काढण्यासाठी जी ससेहोलपट होते ती टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलवर स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करावी, अशी मागणी ओबीसी परिषदेचे विदर्भ अध्यक्ष राजेश लहासे तथा पदाधिकार्यांनी केली आहे.याबाबत सोमवारी ओबीसी परिषदेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. नुकतेच १0 वी, १२ वी व इतर विभागाचे निकाल जाहीर झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक प्रमाणपत्रे तहसिल तथा एसडीओ कार्यालयातून काढावी लागतात आणि त्यासाठी कालावधीसुध्दा कमी असतो. त्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण होवून विद्यार्थ्यांना वेळेवर दाखले मिळू शकत नाहीत. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. तेव्हा याबाबत गंभीर दखल घेवून तहसीलमधील नक्कल विभाग व इतर संबंधीत टेबलवर कर्मचार्यांची संख्या वाढवून स्वतंत्र यंत्रणा ठराविक काळासाठी तयार करावी जेणेकरुन विद्यार्थ्यांना कमी वेळात प्रमाणपत्रे उपलब्ध होतील. तसेच या काळात होणार्या गर्दीचा फायदा घेवून सेतू कार्यालयामार्फत आर्थीक पिळवणूक सुध्दा केली जाते. हे थांबविण्यासाठी सेतू संचालकांना सुध्दा आदेश द्यावेत व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी, असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. निवेदनावर राजेश लहासे यांच्यासह तालुकाध्यक्ष अमोल वानखडे व इतर पदाधिकार्यांच्या सह्या आहेत. तसेच या कालावधीमध्ये स्वतंत्र यंत्रणा बसविणे संदर्भात लवकरात लवकर सूचना कराव्यात अन्यथा ओबीसी परिषदेतर्फे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
दाखले काढण्यासाठी होणारी गैरसोय टाळा
By admin | Updated: June 20, 2014 23:18 IST