गेल्या दीड वर्षात कोरोना काळातील टाळेबंदीमुळे एसटीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. येत्या २२ ऑगस्ट रोजी असलेल्या राखी पौर्णिमा सणाच्या माध्यमातून प्रवासी संख्या वाढविण्याची चांगली संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी सर्व मार्गांवर अतिरिक्त बसेस उपलब्ध करण्यात आल्या असल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रकांनी दिली आहे.
सध्या सुरू असलेल्या रातराणी
बुलडाणा-नागपूर
मलकापूर-पुणे
चिखली-पुणे
मेहकर-पुणे
या मार्गावर वाढल्या फेऱ्या
चिखली-नागपूर
मेहकर-नागपूर
बुलडाणा-औरंगाबाद
मलकापूर-अमरावती
प्रवाशांची गर्दी
राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सातही आगारांमधून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. इतर खासगी वाहनांपेक्षा एसटी बसला प्रवासी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बसस्थानकातील गर्दीत प्रचंड वाढ झाली आहे.
बसस्थानकावर अनेक प्रवासी विनामास्क दिसून येत आहेत. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. यामुळे नागरिकांनी बस प्रवासादरम्यान आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे.
पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे खासगी वाहनांचे भाडे वाढले आहे. मात्र, एसटी महामंडळाने कुठलीही भाडेवाढ केली नाही. बसमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांनी एसटी बसने सुरक्षित प्रवास करावा.
-ए. यू. कच्छवे, विभागीय वाहतूक नियंत्रक, बुलडाणा.