शेगाव: मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात सध्या जिल्हाभर लग्नकार्याचा अक्षरश: धुमधडाका सुरू आहे. पाणीटंचाईचा फटका लग्नसमारंभांनाही बसत असून, उन्हाच्या काहिलीत वर्हाडी मंडळी घामाघूम होत आहे. सुईपासून ते टीव्हीपर्यंतच्या वस्तूंची जमवाजमव करण्यात वधुपिते व्यस्त आहेत, तर वरपित्यांचीही याहून वेगळी स्थिती नाही. दरम्यान, वाढत्या महागाईने वधू-वर पित्यांचेही खिसे हलके होऊ लागले आहेत. ह्ययंदा कर्तव्य आहेह्ण म्हणत अनेक घरांमध्ये सध्या भिंतीच्या ंरंगरंगोटीपासून खरेदीची लगबग सुरू आहे. मे महिना सुरू असल्याने सूर्य आग ओकत आहे. मागील दोन दिवसांत उन्हाची तीव्रता ४२ अंशाच्या वर गेलेली आहे; मात्र या उन्हाची तमा न बाळगता वधू-वर पिता व नातेवाईक बस्त्यापासून ते दागिने खरेदीत व्यस्त आहेत. एकीकडे उन्हाचा कडाका तर दुसरीकडे महागाईचा आगडोंब याचा सामना लगीनघाई असलेल्या मंडळींना करावा लागत आहे. स्वयंपाकासाठी आचारी, लग्न लावण्यासाठी भटजी, बँडवाला, मंडपवाला, फोटो व व्हिडिओ शूटिंग आदी गोष्टी नवरदेवाकडील मंडळीच्या मनासारख्या झाल्या पाहिजेत यासाठी सगळी जुळवा-जुळव करण्यासाठी वधू पित्याची पळापळ सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत सर्वच लग्न साहित्यांत ३0 ते ४0 टक्के वाढ झालेली असल्याचे पाहावयास मिळत आहे. पूर्वी लग्नाच्या अगोदर सहा-सहा महिने रुखवंताची तयारी केली जायची. यासाठी शेजारी-पाजारी सर्वजण मदत करायचे; परंतु आता बहुतांश जण ह्यरेडिमेडह्ण रुखवंताला पसंती देत असल्याचे पाहावयास मिळत आहे. एका रुखवंतासाठी तीन ते पाच हजार रुपये घेतले जातात. रेडिमेड रुखवंतामध्ये शोभेच्या वस्तू, लाडू, शेवया, शेव, करंज्या आदी पदार्थांचा समावेश असतो.
लग्न साहित्यात ३0 ते ४0 टक्के दरवाढ
By admin | Updated: May 19, 2014 00:36 IST