लोणार : तालुक्यातील खळेगाव व अंजनी खुर्द शिवारातील २00 हेक्टरवरील सोयाबीनचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे वाळून गेले आहे. या नुकसानीची पाहणी करून मदतीच्या मागणीसाठी शेतकरी आपल्या शेतातील सुकलेली सोयाबीनची झाडे घेऊन चक्क तहसील कार्यालयावर धडकले. दरम्यान, या नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत देण्याच्या मागणीचे निवेदनही तहसीलदारांना यावेळी दिले. गेल्या वर्षभरापासून शेतकर्यांवर अस्मानी संकट राहिले आहे. अतवृष्टीनंतर गारपीट आणि आता समाधानकारक पाऊस नसल्यामुळे शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन पीक वाळून गेले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतीत उत्पन्न न झाल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे तसेच कीड व रोगांचा मारा यामुळे २00 हेक्टरवरील शेतातील सोयाबीनचे पीक करपून गेले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी या शेतकर्यांनी नायब तहसीलदार मते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मनसेचे विनोद वाघ, शेतकरी बाबाराव मुंढे, बद्रीनाथ सानप, सुभाष सानप, भागवत वायाळ, सुधाकर वायाळ, संतोष वायाळ, माधव सानप, दिनेश कांगणे, रामदास आंधळे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. तहसील कार्यालयावर शेतकर्यांनी स्वत:च्या शेतातील सोयाबीनची सुकलेली झाडेच आणल्याने ते सर्वांचे आकर्षण ठरले.
२00 हेक्टरवरील सोयाबीन वाळले
By admin | Updated: September 22, 2014 23:48 IST