राज्यात १३ हजार कोतवाल : १६ वर्षांत ५६ वेळा चर्चा होऊनही समस्या कायमभंडारा : ब्रिटिशकाळापासून शासकीय सेवेतील शेवटच्या घटकाचे कामे ईमाने-इतबारे करीत असताना आम्हाला चतुर्थश्रेणीचा दर्जा या महागाईच्या काळात मिळणार कधी, असा सवाल राज्यातील उपेक्षित असलेल्या १३ हजार कोतवालांनी केला आहे. दरम्यान मागील १६ वर्षांत ५६ वेळा चर्चा होऊनही न्याय मिळाला नाही. अखेर नवे सरकार आम्हाला न्याय देईल, अशी अपेक्षा या कोतवालांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागात कोतवाल हा पोलीस व महसूल खात्यात काम करणाऱ्या गावातील कमचाऱ्यांना मदत करणारा सेवक म्हणून अनेक वर्षांपासून ओळखला जातो. गावात मुनादी देणे, मृतदेहाचे विल्हेवाट लावणे, शेतसारा जमा करणे, निवडणूक काळात कमर्चारी अधिकारी यांची मर्जी सांभाळणे आदी विविध कामे कोतवालांना करावी लागतात. २ हजार १० रूपये या कोतवालांना महिन्याकाठी मिळते. यात चप्पल भत्ता म्हणून १० रूपये मिळतो. कोतवालांच्या वरचा शिपायाला सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे पाच आकडी पगार मिळतो. परंतू कोतवालाला ६४ रूपयांच्या रोजंदारीत आपल्या कुटुंबाचा गाडा महागाईच्या काळात चालवावा लागतो. पुर्वीच्या काळात अशिक्षीत तथा अल्पशिक्षीत व्यक्ती कोतवाल म्हणून काम करीत असत या कोतवालांचा उपयोग तलाठी तथा संबधीत कर्मचारी कोणत्याही घरगुती कामाकरिता मोठ्या प्रमाणात करीत असत. घरचे दळण आणण्यापासून तर किराणा माल दुकानातून आणण्याची कामे या कोतवालांना सांगण्यात येत असते. परंतू आजच्या संगणक युगात परीक्षेच्या माध्यमातून उतीर्ण झालेल्या सुशिक्षीत कोतवालांची संख्या वाढली आहे. आज ३५ टक्के कोतवाल हे तलाठ्यांच्या शिक्षणापेक्षा एक वर्ग अधीक शिकलेले आहेत. गाव पातळीवर काही तलाठ्यांचे चालणारे उद्योग कोतवालांना माहित होवू नये व आपल्या बारीक कामाकडे लक्ष ठेवू नये, यासाठी अनेक तलाठ्यांनी आपल्या ओळखीतील व्यक्तीला कोतवालाचे अनधिकृत कामे सांगणे सुरू केले असल्याचा आरोप कोतवाल संघटनेने केला आहे. (शहर प्रतिनिधी)
कोतवालांना चतुर्थश्रेणी केव्हा मिळणार?
By admin | Updated: December 12, 2015 00:37 IST