चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदी काठावर असलेल्या पूरग्रस्त पिपरी चुन्ही आणि रेंगेपार गावाच्या पुनर्वसन प्रश्नावरुन नदी पात्रात जलसमाधी घेणारे आंदोलनकर्ते दिल्ली दरबारात पोहोचले आहेत. यामुळे गावकर्यांचे अच्छे दिन येणार असल्याने आशा पल्लवित झालेल्या आहेत.जीवनदायी वैनगंगा नदीच्या अवकृपेने सिहोरा परिसरातील अनेक गावात गावठान पुनर्वसन मंजुरीचा प्रश्न ऐरणीवर आहे. गावाचे पुनर्वसन होत नसले तरी घरांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी ओरड सुरू झाली आहे. बावनथडी आणि वैनगंगा नद्यांना पावसाळ्यात पूर येत आहे. ह्या नद्या धोक्याची पातळी ओलांडत आहेत. पुराचे पाणी गावात शिरत आहे. याशिवाय सातत्याने भुस्खलन होत आहे. गावाच्या दिशेने येणारा हा संकट नागरिकांना भीती निर्माण करीत आहे. या भीतीने अनेक गावकर्यांनी घर सोडले आहेत. कुळ ओलांडताना डोळ्यात अश्रू आहे. परंतु नाईलाज आहे. गावकर्यांनी मायबाप शासनाला गार्हाणे सांगितली आहेत. कुणी ऐकायला तयार नाहीत. पुनर्वसनाचे प्रस्ताव सांगणारे फाईल आता जिल्हय़ातच फिरणारे चित्र निर्माण झाले आहे. राज्य शासनाच्या पुनर्वसन विभागाने या गावांचे प्रस्ताव परत पाठविले असल्याने एकाही गावाचे पुनर्वसन झाले नाही. यामुळे गावकर्यांनी न्यायाची अपेक्षा सोडली आहे. दरम्यान नदी काठावरील दीड हजार लोकवस्तीच्या रेंगेपार वासीयांनी पुनर्वसन प्रस्ताव मंजुरीवरुन पुन्हा ओरड सुरू केली आहे. या गावच्या प्रस्तावाने मुंबई दरबार गाठले आहे. गावकर्यांनी थेट मंत्रालयात चर्चा केली आहे. परंतु ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ अशी अवस्था या प्रस्तावाची झाली आहे. या गावात पुराचे पाणी शिरत नाही असे कारण पुढे करुन नियम आणि निकष सांगण्यात आले आहे. या गावात भुस्खलनाची मुख्य समस्या आहे. यात दलित वस्ती भुईसपाट झाली आहे. जुन्या दस्तऐवजात दलित बांधवांचे अस्तित्व असल्याचे साक्षपुरावे आता जिर्ण झाली आहे. गावात आता दलित बांधव नाही. या गावचे पुनर्वसन प्रस्ताव मंजुरीसाठी नाना पटोले यांनी मोठे आंदोलन केली आहे. मंत्रालयापर्यंंत मागणी रेटून धरली आहे. परंतु सारे प्रयत्न व्यर्थ गेली आहे. यामुळे गावकर्यांनी अपेक्षा सोडली आहे. मंत्रालयात न्याय मिळत नसल्याने कुणाच्या दरबारात न्यायाची अपेक्षा करावी असे कळेनासे झाले आहे. नाना पटोले यांनी या गावात अखेरचे जलसमाधी आंदोलन केले आहे. ४७ गावात या आंदोलनाने नाना पटोले यांचे नाव पोहोचले आहे. दरम्यान, राज्यात गावकर्यांना न्याय मिळाला नाही. गावकर्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दिल्ली दरबार निधी वाटपाचा रिझर्व्ह बँक आहे. याशिवाय विकास घडवून आणणारे अनेक विभाग आहेत. गावकर्यांना न्याय देण्यासाठी खासदार पटोले यांना मनात घ्यावे लागणार आहे. याच गावालगत पिपरी चुन्ही गाव आहे. या गावात धरण बांधकाम नवे संकट निर्माण करणार आहे. धरण लगत घरे असल्याने पुराचे पाणी शिरणार आहे. यामुळे घरे कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या गावाला पुनर्वसन प्रक्रियेतून डच्चू देण्यात आला आहे. साधा प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही. यामुळे गावकरी भयभीत आहेत. नदी काठावरील घरांचे पुनर्वसन करण्याची रास्त अपेक्षा गावकरी करीत आहेत. सध्या केंद्र शासन नद्यांचे पुनर्बांंधणी तथा स्वच्छता करण्याचा कृती आराखडा तयार करीत आहे. सिहोरा परिसरात वैनगंगा नदी दुषित नाही. स्वच्छतेचा संदेश देत आहे. या नदीकाठाचे सौंदर्यीकरण केल्यास गावाचे संरक्षण होणार आहे. नदीकाठाला सुरक्षा भिंत बांधकामाची ओरड गावकरी करीत आहेत. यामुळे गावात पुराचे पाणी शिरणार नाही. (वार्ताहर)
रेंगेपारवासीयांचे ‘अच्छे दिन’ केव्हा?
By admin | Updated: June 8, 2014 23:44 IST