सावरगावच्या चहुबाजूने पाणी : गोसीखुर्दचा जलस्तर २४०.४०० मीटर वाढलागोसेबुज : विदर्भातील महत्वाकांक्षी राष्ट्रीय गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम मागील दोन दिवसापासून सुरु करण्यात आला आहे. धरणाचा जलस्तर आज २४०.४०० मीटरवर पोहचला असून भंडारा व नागपूर जिल्ह्यातील अनेक गावात पाणी शिरून शेकडो एकर शेती पाण्याखाली आली आहे. वडदच्या अनेक घरात पाणी शिरले आहे. सावरगावला जाणारा एक मात्र रस्ताही बुडाल्यामुळे हे गाव पाण्याने वेढले आहे. पाथरीचा मुख्य रस्ता बुडणार असून हे गावही पाण्याने वेढणार आहे.गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम मागील दीड महिन्यापासून सुरु आहे. पण धरणाचा जलस्तर २४० मीटर होताच बुडीत क्षेत्रातील अनेक गावात पाणी शिरणे सुरु झाले होते. एक एक करीत मोठ्या संख्येने घरे बुडत होती. दिवाळी सण, धान निसवण्याची आणि जलस्तर वाढविण्याची वेळ एकच आल्यामुळे स्थलांतराकरिता प्रकल्पग्रस्तांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जलस्तर वाढविण्याला स्थगिती देण्याची मागणी केली. १५ आॅक्टोबरपर्यंत जलस्तर २४०.१०० मीटरवर स्थिर ठेवण्यात आले.१६ आॅक्टोबरपासून २४०.१०० मिटर पासून जलस्तर वाढविण्याचे काम पुन्हा सुरु करण्यात आले आहे. आज जलस्तर २४०.४०० मिटर पोहचताच दोन्ही जिल्ह्यातील बुडीत क्षेत्रातील अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरून शेकडो एकर शेती पाण्याखाली आली आहे. गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्यापूर्वी सरकारी अधिकाऱ्यांनी वडद गावच्या खालच्या बाजूला ८.१० घरात पाणी शिरण्याची शक्या असल्याने त्यांना स्थानांतरण करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, प्रत्यक्षात, जलस्तर वाढल्यामुळे काहीही ध्यानी मनी नसताना दुसऱ्याच भागातील ढिवर समाजातील वॉर्डातील ८.१० घराजवळ पाणी शिरून त्यांचा जाण्यायेण्याचा मार्ग बंद झाला आहे. प्रशासकीय अधिकारी बुडीत क्षेत्रातील गावातील धरणातील पाण्याची पातळी घेण्याचे अंदाज चुकत असल्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने बुडीत क्षेत्रातील प्रत्येक गावाची धरणाची पातळी तपासण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
वडद येथील घराघरांत शिरले पाणी
By admin | Updated: October 18, 2014 22:58 IST