भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगेचे विशाल पात्र आहे. वैनगंगेच्या तीरावर ९९ गावे वसली आहे. त्यापैकी ८३ गावांना पुराचा फटका बसतो. त्यात भंडारा तालुक्यातील २२, मोहाडी १२, तुमसर १५, पवनी ३३ आणि लाखांदूर तालुक्यातील नऊ गावांचा समावेश आहे. गोसेखुर्द येथे धरण झाल्यापासून पुराची तीव्रता वाढली आहे. प्रकल्पातून अतिरिक्त झालेले पाणी विसर्ग केल्यानंतर धरणाखालील गावात पूरस्थिती निर्माण होते. तर पाणलोट क्षेत्रात पुरेसे पाणी विसर्ग झाले नाही की बॅक वॉटर अनेक गावांमध्ये शिरते. भंडारा तालुक्यातील अर्जूनी, कोरंभी, पिंडकेपार, सुरेवाडा, मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज., ढिवरवाडा, घाटकुरोडा. तुमसर तालुक्यातील परसवाडा, तामसवाडी. पवनी तालुक्यातील सावरगाव, पवना खुर्द, जुनोना या गावांचा संपर्क तुटतो. विशेष म्हणजे मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि गोंदिया जिल्ह्यातील कालीसराट आणि पुजारीटोला प्रकल्पातील पाण्याचा विसर्गही या गावांसाठी धोकादायक असतो.
बॉक्स
असा बसला आतापर्यंत महापुराचा फटका
दरवर्षी पुराचा फटका बसत असला तरी गत २० वर्षांत चार वेळा नदीतीरावरील नागरिकांना महापुराचा फटका बसला आहे. १४ ते १७ सप्टेंबर २००५ मध्ये वैनगंगेला महापूर आला होता. त्यात चार हजार लोक पूरबाधित झाले होते. ८ सप्टेंबर २०१९ रोजी संजय सरोवरातून पाणी सोडण्यात आल्याने भंडारा शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील विविध भागांत पाणी शिरले होते. गतवर्षी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात महापूर आला. संजय सरोवरातून पाणी सोडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरफच्या तीन चमूंना, एसडीआरएफच्या तीन चमूंना पाचारण करण्यात आले होते. ४४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. चौघांचा महापुरात मृत्यू झाला तर शेकडो हेक्टर जमीन नष्ट झाली होती.