नोटांच्या तुटवड्यावर प्रभावी उपाय : पारंपरिक व्यवसायिकांना सोईस्करभंडारा: सध्या देशात ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांचा तुटवडा झाल्यामुळे संपूर्ण देशातील लोकांना याचा थेट फटका बसताना दिसत आहे. विशेष करुन शहरी भागात याचा प्रत्यक्ष परिणाम बघायला मिळत आहे. कारण एकूण चलनातून जवळपास ८० टक्के चलन मुद्रा एकाएकी बंद झाली आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये गावागावात जुन्या काळची बलूतेदारी पद्धत वापरुन नोटांच्या तुटवड्यावर प्रभावी उपाय योजना अमलात आणण्याचे काम ग्रामीण जनता करीत आहे. यात विशेषकरुन शेतकरी वर्ग आणि पारंपरिक व्यवसाय व कुटीर उद्योग करणारे लोक या बलुतेदारी पद्धतीचा उपयोग करीत आपल्या दैनंदिन गरजा भागविण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत.बलूतेदारी पद्धती म्हणजे वस्तुच्या बदल्यात वस्तू प्राप्त करुन आपली गरज भागविणारी वस्तु विनिमय प्रणाली आहे. ही प्रणाली आदिकाळापासून भारतीय अर्थव्यवस्थेत आपली महत्वाची भूमिका पार पाडत राहिली आहे. एकीकडे नोटबंदीमुळे नोकरदार, व्यापारीक, सेवा कार्य करणारा वर्ग कमालीचा त्रस्त आहे. अशातच गावात राहणारा शेतकरी आपले सामान्य जीवन जगताना दिसत आहे. याला मुख्य कारण असे की, ग्रामीण भागात शेतकरी वर्ग सर्वात जास्त प्रमाणात वावर करीत असून त्यापाठोपाठ मजूर वर्ग वास्तव करीत असतो. सध्या खरीपाच्या धानपीकाची कापणी आणि मळणीचे काम जोरात सुरु आहे. अशात शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. परंतु सर्वांची गरज भागविणारी वस्तू म्हणजे पोटाला अन्न रुपात महत्वाचे घटक तांदुळ निर्माण करणारा धान त्यांच्या भंडारात भरपूर प्रमाणात आहे. त्यापासून कोणताही शेतकरी केव्हाही अर्थार्जन करु शकतो. धान पीक ही आपल्या शेतकरी वर्गाची सर्वात मोठी ताकद आहे. यंदा भरघोस धान उत्पादन झालेले दिसत असून शेतीवर अवलंबित मजूर वर्गाला सुद्धा धान सहज उपलब्ध होते. कारण की मजूरी करवून घेणारा शेतकरी सुद्धा मजूरीच्या मोबदल्यात पैसे न देता धान देतो. आदी काळात मुद्रेचा जन्म होण्यापुर्वी लोक बलुतेदारी पद्धती म्हणजे वस्तू विनिमय प्रणालीच्या आधी आपल्या गरजा भागविण्याचे काम करीत असे. कुंभार आपले मडके किंवा मातीचे भांडे शेतकऱ्याला देऊन त्याच्याकडून धान, तांदूळ, तुर, दाळ इत्यादी शेतीत उत्पादन होणारे धान्य घेत असे. तेल काढणारा तेली सुद्धा आपले तेल विविध वर्गाला देऊन त्या-त्या व्यक्तीकडून त्यांच्याकडील वस्तू प्राप्त करायचे. अशा व्यवहारात मुद्रा महत्वाची राहत नाही. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये कालांतराने अनेक अडचणी भासू लागल्या. यात मुख्य करुन काही लोकांची वस्तू महाग तर काहींची स्वस्त राहिल्याने देवाण-घेवाण करताना परवडत नसे. तसेच काहींकडे अनेक वस्तू तर काहींकडे एकच वस्तू तेवढ्याच किमतीची असायची. परंतु ती एक वस्तू सगळ्यांना वाटून देता येत नव्हती.या अडचणीतून मुद्रेचा जन्म झाला. चलनात वस्तू किंवा सेवेऐवजी मुद्रेची देवाण-घेवाण सुरु झाली. आधी विविध वस्तू व दगडांचा मुद्रेच्या रुपात उपयोग व्हायचा नंतर धातू मुद्रा जन्माला आली. यात ही वेगवेगळे स्वरुप काळानुसार बदलत गेले. अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा राहिल्या आहेत. बदलत्या जीवन शैलीनुसार विलासीत जीवनाच्या गरजा वाढू लागल्या. यासाठी कागदी मुद्रेचा उपयोग चलनात मोठ्या प्रमाणात होऊ लागला. भारतीय समाज व्यवस्थेत अनेकांनी मुद्रा संग्रहीत करुन ठेवण्याऐवजी मौल्यवान वस्तू ,दागिणे, किमती धातू संग्रहीत करुन ठेवण्याची पद्धत सुद्धा टिकून राहिली आहे. चलन मुद्रेच्या रुपात कागदी मुद्रेच्या अधिक वापरामुळे समाजात गरिबी-अमिरी ची दरी सुद्धा वाढत राहिली.परंतु या सर्व घडामोडी चालत असताना मानवाच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी वस्तू विनिमय प्रणाली जास्त उपयोगी ठरत राहिली. तीन मुलभूत गरजापैकी निवासाची गरज एकदा पूर्ण झाली की अनेक वर्षासाठी कायम असते. वस्त्राची गरज काही काळासाठी पूर्ण होते. परंतु अन्नाची गरज रोजची असते. अशात चलन मुद्रा असो किंवा नसो ती गरज मानवाला पूर्ण करावीच लागते. अशावेळी वस्तू विनिमय हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. नेमका याचाच फायदा सध्या ग्रामीण भागात घेतला जात असून सध्या बलुतेदारी पद्धतीचा अवलंब करून नागरिक आपल्या गरजा भागवित आहेत. (नगर प्रतिनिधी)
गावांमध्ये वाढलीय बलुतेदारी!
By admin | Updated: November 19, 2016 00:40 IST