पवनी : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून यासाठी नगर परिषदेद्वारे शहरातील निम्या नाल्याची साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे मान्सूनपूर्व तयारी झाली नसल्याचे दिसून येते. अनेक वॉर्डातील नाल्या तुंबलेल्या स्थितीत आढळून आल्या. ज्या नालीची सफाई दहा दिवसापूर्वी झाली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे ती नाली अजूनही केरकचऱ्याने तुडूंब भरल्या अवस्थेत पाहावयास मिळत आहेत. तर दस्तुरखुद नगराध्यक्ष यांचे वॉर्डातील महादेव गभणे यांचे घरात दोन वर्षापासून पावसाचे पाणी शिरत असतानाही त्यांची समस्या निकाली काढण्यास नगराध्यक्ष व नगरपालिका प्रशासन अपयशी ठरलेली आहे. नाल्यांची सफाई करण्याचे कंत्राट शहरातीलच एका कंत्राटदाराकडे असला तरी प्रत्यक्ष त्या कंत्राटचा मालक नगरपालिकेचा पदाधिकारी असल्याचे बोलल्या जात आहे. नगरपालिका प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याची चर्चा गावात रंगताना दिसत आहे.येथील जवाहरगेट मधून वाहणाऱ्या मुख्य नाल्याची वर्षानुवर्षे सफाई होत नाही. त्यामुळे गावातील लहान मोठ्या नाल्यातून वाहत येणारे सांडपाणी पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरुन वाहत आहे. याचा त्रास पवनी शहरात प्रवेश करणाऱ्या शहरवासीयांना तसेच बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे. याच जवाहर गेटमधून रोजच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी ये-जा करत असूनही त्यांना ही समस्या दिसू नये, याशिवाय पवनीवासीयांचे दुर्दैव अजून कोणते असू शकते.शहरात असलेल्या नाल्या हा सांडपाणी वाहून जाण्याकरीता बांधण्यात आल्या असल्या तरी काहींनी या नाल्यावर अतिक्रमण केले आहे. घरातील व दुकानातील केरकचरा या नाल्यात टाकल्या जात असतानाही पालिका प्रशासन असे अतिक्रमण काढणे किंवा नाल्यात दुकानातील केरकचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यास धजावत नाही. पदाधिकारी मात्र मताचे राजकारण करण्यात मशगुल आहेत.शहरातील पद्मा वॉर्डातील रहिवाशी महादेव गभणे यांचे घरासमोरील नाली ही पाणी वाहून जाणाऱ्या दिशेकडून उतार न काढल्यामुळे त्यांचे दारातच पाणी तुडूंब भरले जाते. दमदार पाऊस झाल्यास पाणी घरात शिरुन अन्नधान्याची व जिवनावश्यक वस्तुंची हानी दरवर्षी होत असतानाही या समस्येकडे येथील पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यांचे घरासमोरील एका उपहारगृह व्यवसायीकाने त्यांचे उपहारगृहमधील सांडपाणी व उष्टे वाहून जाण्याकरीता पालिकेच्या नालीला जोडल्याामुळे तिथे दुर्गंधी होते. त्या भागात जात असताना नाकावर रुमाल बांधून जाणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे परिसरातील जनतेच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु याही बाबीकडे परिसरातील जनतेनी तक्रार करुनही दुर्लक्ष केल्या जात आहे.मोठे नाले व लहान नाल्यांची सफाईचे काम मागील वर्षात पावसाळ्याच्या दिवसात पूर्ण न केल्यामुळे शहरातील घोडेघाट वॉर्ड, तोडेश्वर वॉर्ड व इतर वॉर्डातील नागरिकांच्या घरात तुडूंब पाणी भरुन अतोनात नुकसान झाले होते. या घटनेतून बोध घेऊन न.प.प्रशासन व पदाधिकारी यावर्षी नाल्यांची साफसफाई करतील, अशी नगरवासीयांची अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षाच राहीली. तर जवाहर गेट परिसरात पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर पाणी साचून राहात असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असतानाही पालिका प्रशासन गप्प का, हा प्रश्न नागरिकांना पडत आहे.दमदार पाऊस कोसळण्यापूर्वी नाल्यांची साफसफाई करणे व नाल्यावरील अतिक्रमण काढून पाणी वाहूून जाण्यास नाल्या मोकळ्या करण्यात याव्यात, अशी शहरवासीयांची मागणी आहे. याकडे पालिकेचे मुख्याधिकारी व अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पवनी शहरातील नाल्या सफाईअभावी तुंबल्या
By admin | Updated: June 15, 2014 23:24 IST