नियोजनाचा अभाव : शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था, केंद्रांसमोर धानाची आवक वाढलीसाकोली : उन्हाळी भातासाठी आधारभूत धान खरेदी योजनेतील तुघलकी व्यवस्थेमुळे संपूर्ण तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केंद्रे सुरू केले आहे. दोन दिवसांनी कोणत्या गावाचे धान कोणत्या केंद्रावर घेण्यात येईल, याचा घोळ निर्माण केल्याने पुर्वीच सुविधा असलेल्या केंद्रावर धान आणलेल्या शेतकऱ्यांमध्ये धास्ती बळावली आहे. रेल्वेत ऐन वेळेवर प्लेटफॉर्म बदलल्यावर प्रवाशांची जशी अवस्था होते, तशी अवस्था सध्या खरेदी केंद्रावर धान आणून ठेवलेल्या शेतकऱ्यांची झाली आहे. १६ मे रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी गावनिहाय खरेदी केंद्राची यादी जाहीर केली, हे येथे उल्लेखनीय आहे. या नव्या व्यवस्थेमुळे केंद्रावर आठ-दहा दिवसांपासून धान आणून ठेवलेल्या शेतकऱ्यांना आपल्या केंद्रावर धान नेण्यासाठी मोठा प्राणायोग करावा लागणार आहे.१५ मे पासून तालुक्यात केंद्राव्यतिरिक्त पळसगाव व सुकळी अशा १० केंद्रे सुरू केली. त्याआधीच्या शेतकऱ्यांनीे धान सोयीच्या केंद्रावर लवकर नंबर लागवा म्हणून नियोजित तारखेच्या चार-पाच दिवसापासून आणून ठेवले. परंतु जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दोन दिवसानंतर गावनिहाय खरेदी केंद्राची यादी जाहीर केली. त्यामुळे आपल्या सोयी प्रमाणे धान केंद्रावर आधीच नेवून ठेवलेल्या काही शेतकऱ्यांचे गावनिहाय प्रमाणे केंद्र नसल्याने तेथून धान उचलून आपल्या नियोजित केंद्रावर धान देण्यास मोठी कसरत करावी लागेल. (तालुका प्रतिनिधी) गोदामाचा लहान आकार, अव्यवस्थासावरबंद, एकोडी, परसोडी, सुकळी, सातलवाडा येथील धान साठवणुकीचे गोडावून लहान आहेत. त्यामुळे येथील गोडावूनची क्षमता पूर्ण झाल्यावर खरेदी न झालेल्या उर्वरित शेतकऱ्यांना पुन्हा आपला माल दुसऱ्या केंद्रावर न्यावे लागेल. त्याचाही भुर्दंड शेतकऱ्यांना बसेल. आज घटकेस साकोली, विर्सी, सानगडी, पळसगाव येथे गोडावून मोठे असले तरी आजमितीस या खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल धान मैदानावर आणून ठेवले आहेत. या व्यतिरिक्त साकोली विर्सी सानगडी येथे शेकडो ट्रॅक्टरर्समध्ये धान भरून रांगेने उभे आहेत. वरीलपैकी सुकळी, निलज, सावरबंद व सातलवाडा येथे काही सुविधांअभावी ही केंद्रे बातमी लिहीपर्यंत सुरू होऊ शकली नाहीत. तर काही मोठ्या केंद्रावर हमालांच्या तुटवड्यामुळे धान मोजणीचा वेग मंदावला आहे.येत्या काही दिवसात धान शेतकऱ्यांचा पावसाळी हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी धान लवकर मोजनू व्हावा या प्रयत्नात आहे. त्यातच जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या तुघलकी निर्णयामुळे शेतकरी भांबावून गेला आहे. बाजार समिती लाखनी, जिल्हाधिकारी भंडारा, आमदार बाळा काशीवार, खरेदी एजेंट व अन्य संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देवून जो माल सध्या ज्या खरेदी केंद्रावर आहे तेथेच मोजण्याची पूर्वीप्रमाणे व्यवस्था करावी, अशी मागणी भाजयुमोचे जिल्हा महामंत्री व बाजार समिती संचालक अॅड. मनिष कापगते यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांनीही या संबंधाचे निवेदन तहसीसलदारांना दिले आहे.
धान खरेदी योजनेची तुघलकी व्यवस्था
By admin | Updated: May 19, 2016 00:28 IST