लोकमत विशेषरंजीत चिंचखेडे चुल्हाड(सिहोरा) बारा हजार हेक्टर आर शेतीला रब्बी आणि खरीप हंगामात पाणी वाटप करणाऱ्या चांदपूर जलाशयाच्या नहरांची अवस्था संतापजनक झाली आहे. नहर व कालवे केरकचरा तथा झुडुपांनी तुंबल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. या नहरांंचा कायापालट रोहयोतून करण्यासाठी रोहयो परिसरातील सरपंच एकवटले आहेत.सिहोरा परिसरात शेती नागरिकांच्या उपजिवीकेचे साधन आहे. शेती व्यवसायातील प्रमुख पिक उत्पादनावर परिसरातील अर्थव्यवस्था आहे. परिसरात १२ हजार हेक्टर आर शेतीला सिंचीत करण्यासाठी चांदपूर जलाशयाचे प्रमुख कालवे आणि नहर आहेत. शेत शिवारात पादचाऱ्या आहेत. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या कालवे आणि नहराची स्वच्छता, दुरुस्ती, खोलीकरण, मातीकाम, मुरुम कामे तथा सिमेंट अस्तरीकरणाची कामे झाली नसल्याने पाणी वाटपात नवे संकट निर्माण होत आहे. नहरात झुडुपांना पाणी अडत असल्याने नहरांना यंदा भगदाड पडली आहेत. अनेक नहर जीर्ण झाली आहेत. या संदर्भात शेतकरी पाटबंधारे विभागात गाऱ्हाणे ऐकवीत आहेत. लेखी स्वरुपात तक्रारी देत आहेत. परंतु शासन स्तरावर निधी प्राप्त होत नसल्याची बाब सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही. पाटबंधारे विभाग तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत नाही. आऊटलेटची बांधकामे मंजूर केली जात आहेत. कंत्राट वाटपाचे नियोजन गुपचूप पद्धतीने शिजत आहेत. मुरुमऐवजी मातीचा 'लॉलीपाप' नहरांना दिला जात आहे. यामुळे नहर आणि कालव्यांना न्याय मिळत नाही. शेतकरी दरवर्षी शासनाला पाणी पट्टी करातून २० ते २५ लाख रुपये जमा करीत आहेत. या राशीमधून विकास कामात छदामही खर्च केला जात नाही.शेतकऱ्यांना न्याय देताना प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. अधिकाधिक सिंचित क्षेत्र वाढविण्यासाठी नवीन नहर प्रस्तावित आहेत. केंद्रीय मंत्री असताना खा.प्रफुल पटेल यांची निदर्शनास शेतकऱ्यांनी आणून दिले आहे. परंतु नवीन नहर तथा पादचाऱ्यांच्या कामांना अद्याप मंजुरी देण्यात आली नाही. यामुळे परिसरात स्थिती जैसे थे आहे. दरम्यान सिंचनाकरिता शेतीला पाणी प्राप्त होत नसल्याने कैफियत शेतकऱ्यांनी ग्रामसभेत मांडली आहे. नहर, कालवा व पादचाऱ्या चकाचक करण्याचे नियोजन रोहयोतून करण्यासाठी निवेदन दिली आहेत. या शेतकरी व जनतेच्या हिताच्या निर्णयाला सरपंचानी मंजुरी दिली असून गावाच्या हद्दीत असणाऱ्या नहरांची स्वच्छता, मातीकाम करण्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रोहयोतून सिमेंट, रस्ते व नाली बांधकामावर सिहोरा परिसरात 'ब्रेक' लावण्याचे निवेदन बिडीओ यांना दिले जाणार आहे. पंचायत समितीचे गट नेते तथा सदस्य हिरालाल नागपुरे यांनी रास्त निर्णयावर आढावा बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी उदयोन्मुख निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंचायत समितीच्या रोहयो सभेत सिहोरा परिसरातील सरपंच मजुरांना कामे उपलब्ध करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी नहरांची स्वच्छता करणारा निर्णय लावून धरणार असल्याचे सरपंचांनी सांगितले.
रोहयोतून करणार कालव्याचा कायापालट
By admin | Updated: August 24, 2015 00:47 IST