लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :बेरोजगारीला कंटाळून एका २५ वर्षीय तरुणाने वैनगंगा नदी पात्रात उडी घेतली. याचवेळी क्षणाचाही विचार न करता एका ३७ वर्षीय इसमाने नदीपात्रात उडी घेत त्या तरुणाचे प्राण वाचविले. स्कंदन नारनवरे रा. ग्रामसेवक भंडारा असे प्राण वाचवलेल्या तरुणाचे नाव आहे. अनिरुद्ध भानुदास हटवार (३७) रा. एमएसईबी कॉलनी राजगोपालाचारी वॉर्ड भंडारा असे प्राण वाचविणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास कारधा वैनगंगा मोठ्या पुलावर घडली.
माहितीनुसार, बुधवार सकाळी ९:३० वाजताच्या स्कंदनने वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलावरून नदीत उडी घेतली. यावेळी अनिरुद्ध हा कवलेवाडा येथे जात होता. त्याचा समोर एक कार होती. स्कंदनने नदीत उडी घेतल्याबरोबर कारचालकाने वाहन थांबविले. याची माहिती अनिरुद्धला मिळाली. अनिरुद्ध यांनी क्षणाचाही विचार न करता पुलाच्या दुसऱ्या बाजून खाली उतरून नदीत उडी घेतली. यावेळी गंटागळ्या खात असलेल्या स्कंदन ला नदीकाठावर आणले. यावेळी तो बेशद्ध झाला होता.
काढली समजूत अन् सुखरूप आणले परतनदी काठावर स्कंदनला आणताच त्याच्या पोटातील पाणी काढले. यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. यावेळी स्कंदनच्या वडिलांना फोन करून बोलावण्यात आले. यावेळी त्याची समजून काढण्यात आली. बेरोजगारीला कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्कंदनने सांगितले. सरतेशवटी तो आपल्या वडिलांसोबत सुखरूप घरी पोहचला.