दिल्लीच्या बैठकीसाठीही निमंत्रण : शिशुपाल पटलेंच्या प्रयत्नांना यशराहुल भुतांगे तुमसर शेतीमध्ये लागवड खर्चातील अर्धा खर्च हा मजुरीवर होतो. तो खर्च कमी झाला तरच शेतकरी सुखी होवू शकतो. याकरिता पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोजगार हमी योजनेतून घ्यावित यासाठी खासदार शिशुपाल पटले यांचा संघर्ष सुरु होता. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्रांना विषयाची गंभिरता पटवून दिल्याने मुख्यमंत्र्यांनी याला हिरवा कंदिल दाखविला. त्यामुळे रोवणी ते कापणीची कामे रोहयोतूनच होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. रोवणी ते कापणी पर्यंतची कामे रोहयोतून घ्यावीत या मागणीकरिता शिशुपाल पटले यांनी बराच संघर्ष केला आहे. मागील कित्येक वर्षापासून केंद्र तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. गत तिन वर्षापुर्वी याच विषयाला धरुन मांढळ ते पालोरा अशी १० दिवसाची किसान संघर्ष यात्रा काढली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मांढळ येथे शेतकरी संघर्ष यात्रेचा शुभारंभ झाला होता.शिशुपाल पटले यांनी वर्षभरापूर्वी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह तसेच तत्कालीन केंद्रीय ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांची सुध्दा भेट घेवून विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते. दरवर्षी धान कापणी झाल्यानंतर आधारभुत किंमतीचा विषय एरणीवर येतो. उत्पादन खर्चावर आधारित भाव शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकरी आर्थिक संकटात सापडत असतो. परिणामी मोर्चे आंदोलने होतात. त्याकरिता हा विषय कायमचा मार्गी लावणे गरजेचे आहे. त्याकरिता मजुरीवर होणारा खर्च रोहयोच्या माध्यमातून झाल्यास मजुरांनाही २०० दिवस कामे देता येतील व आधारभुत किंमतीचा विषय ही संपुष्टात येईल. मात्र शेतीची कामे ही खाजगी स्वरुपात येत असल्याने अडचणी निर्माण होवू शकतात असा संशय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. त्यावर सिंचन विहिरी शेततळे, मजगी कामे, फळबाग लागवड ही सुध्दा खाजगी कामे आहेत. ती कामे होवू शकतात तर ही कामे का होवू शकत नाही असा प्रतिप्रश्न पटले यांनी चर्चे दरम्यान उपस्थित केला. यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाशी लवकरच बैठक लावून चर्चा घडवून आणू व आवश्यकता पडल्यास त्या बैठकीत तुम्हालाही उपस्थित राहण्याचे निमंत्रण देणार असे सांगितले. रोवणी ते कापणीची कामे रोहयोतून कसे करता येईल याचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सचिवाला दिले आहेत. त्यामुळे लवकरच रोवणी ते कापणीची कामे रोहयोतून सुरु होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. शेतकरी व मजूर दोघांच्याही आयुष्यात आनंद निर्माण करु शकणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असेही पटले यांनी सांगितले.
रोवणी ते कापणीची कामे होणार रोहयोतून
By admin | Updated: September 26, 2016 00:50 IST