मोहन भोयर तुमसरचारगाव (माडगी) येथील दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या कोळी व दलित बांधवांच्या नऊ कुटुंबांना हवी आहे, मायेच्या ऊबची गरज. खितपत जीवन जगणाऱ्या या कुटुंबियांना अजूनही केवळ आशेवरच जगावे लागत आहे. त्यांच्या वस्तीत आजतागायत पाणी व वीज या मुलभूत सुविधांचा अभाव आहे. अच्छे दिनाचे स्वप्न किमान या पिडीत पूर्ण होईल हीच अपेक्षा घेऊन ते नव्या पहाटेचे स्वागत करतात.तुमसर-गोंदिया राज्य महामार्गापासून अवघ्या एक किमी अंतरावर वैनगंगा नदी काठावर चारगाव (माडगी) हे छोटेशे गाव आहे. गावाबाहेर पूर्व दिशेला वैनगंगा नदी वाहते. नदी काठावर गरीबीचा प्रत्यक्ष स्पर्श तथा दु:खाची कळ अनुभवलेले नऊ कोळी व दलित बांधवांचे कुटूंबे मागील ६० वर्षांपासून झोपडीवजा चंद्रमौळीत राहत आहेत. एकूण ४० जणांचा यात समावेश आहे. यात पुरुष, महिला, तरुण, तरुणी, लहान मुले, मूलींचा समावेश आहे. या वस्तीत वीज व पाणी या मूलभूत सोयी अजूनपर्यंत प्रशासनाने पुरविल्या नाहीत. या कुटुंबियांनी प्रकाश पाहीला नाही. अजूनही दिव्याच्या उजेडात ते खितपत जीवन जगत आहेत. पाणी आणण्याकरिता येथील महिलांना गावाच्या दुसऱ्या टोकावर अथवा वैनगंगा नदीतून अर्धा ते पाऊन कि.मी. चालत जाऊन पाणी आणावे लागत आहे.या वस्तीत जाण्याकरिता मातीचा शेतावर जाणारा पांधण रस्ता आहे. जीव धोक्यात घालून त्यांना रात्री जावे लागते. मासेमारी करणे हा त्यांचा मुख्य रोजगार आहे. दारिद्रय रेषेखाली हे सर्व कुटूंबे येतात. यात शालीक मेश्राम, बाबुराव बळगे, वामन तुमसरे, पतीराम शेंडे, दयाराम भुरे, वसंत मेश्राम, ताराचंद मेश्राम, भोला तिजारे, सुनकाबाई मेश्राम यांचे कुटूंब वास्तव्य करीत आहे. येथे शौचालयाची साधी व्यवस्था ग्रामपंचायतीकडून करण्यात आली नाही. शौचालयाकरिता शासन अनुदान देते. अशा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा नियम आहे. हे विशेष. कायम अभावाशी झगडणाऱ्या गावात मानवी हिंमत दाखविणाऱ्या कुटूंबापुढे डोंगराएवढ्या मोठ्या समस्या असताना गावचे लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांनी अजूनपर्यंत या वस्तीकडे लक्ष दिले नाही. गरीबीशी झुंजणाऱ्या व दारिद्रय रेषेखाली जिवन जगणाऱ्या य कुटुंबाच्या जिवनात कधी अच्छे दिन येणार काय? असा प्रश्न या कुटूंब सदस्यांना पडला आहे. त्या अधिकाऱ्यांनी घेतली दखलवीज समस्येबाबत लोकमतने उपविभागीय अभियंता नंदलाल गडपायले व कनिष्ठ अभियंता विशाल गवते यांना सांगितले. शासनाच्या योजनेअंतर्गत वीज देता येते. प्रत्यक्ष त्यांच्या लोकवस्तीला भेट देऊन दोन दिवसापूर्वी पाहणी केली. नियमांचा आधार घेऊन तशी कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. दोन्ही अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ही कामे का झाली नाहीत, असे आश्चर्य व्यक्त केले.कोळी व दलित बांधव वास्तव्य करणाऱ्या वस्तीत वीज व पाणी नाही. आता कूपनलिका मंजूर करण्यात आली आहे. वीज कनेक्शन मिळावे याकरिता लवकरच तसे कागदपत्रे वीज वितरण कंपनीकडे पाठविणार आहे. येणाऱ्या काही दिवसात या वस्तीत वीज नक्कीच येईल.- डी. बी. गायधने, ग्रामसेवक चारगाव
‘ते’ जगतात अपेक्षेच्या ओझ्याखाली जीवन
By admin | Updated: April 27, 2015 00:16 IST