रिक्त पदांचा फटका : नागरिकांची पायपीट, आल्यापावली परतण्याची वेळपवनी : १ लाख ५४ हजार लोकसंख्या असलेली पवनी तहसील कार्यालय कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रामभरोसे आहे.यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. अनेक प्रकरणे निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. येथील तहसीलदाराचा कारभार नायब तहसीलदार तर नायब तहसीलदाराचा कारभार अव्वल कारकून सांभाळीत आहेत. येथे कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पवनी तालुका हा गौण खनीज संपत्तीने भरलेला आहे. या तालुक्यात आठ रेतीघाट, मुरुम, दगड अशा अनेक गौण खनिजाच्या खाणी आहेत. मात्र गौण खनिजाचे रक्षण करणारे महसूल विभागाचे कर्मचारी अल्प प्रमाणात आहेत. रात्रभर जीव मुठीत घेऊन गौण खनिजांचे रक्षण करणे व दिवसभर जनतेचे कामे करणे हे नित्यक्रम ठरले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कामाच्या अतितानामुळे आरोग्यावर विपरित परिणाम जाणवत आहे. या तालुक्यात ७८ ग्रामपंचायतींचा समावेश असून १५७ गावे व १ लाख ५४ हजार लोकसंख्या आहे. सहा महिण्यापूर्वी तहसीलदार नरेंद्र राचलवार सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून येथील कारभार नायब तहसीलदार महेंद्र वाकलेकर हे प्रभारी म्हणून काम सांभाळीत आहेत. तर येथील अव्वल कारकून चरणदास शेंडे हे प्रभारी नायब तहसीलदारांचा कारभार सांभाळीत आहेत. प्रभारी तहसीलदार कोणत्या ना कोणत्या कामामुळे बाहेर राहत असल्यामुळे कार्यालयात उपस्थित राहत नाही. कर्मचाऱ्यांना रिक्त जागामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलेला आहे. परिणामी अनेक कर्मचारी मेडीकलच्या सुट्या काढीत आहेत. तर अनेक बदलीच्या मागे लागले आहेत. येथील तहसीलदार कर्मचाऱ्यांना कामावर कमी व गौण संपत्तीचे रक्षण करायला पाठवितात. त्यामुळे जनतेचे कामे खोळंबली आहेत. अजूनपर्यंत रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना गौण खनिजाचे रक्षण करताना दमछाक करावी लागते आहे. (शहर प्रतिनिधी)
तहसील कार्यालय रामभरोसे
By admin | Updated: February 24, 2016 00:41 IST