भंडारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गावपुढाऱ्यांनी गावातील मूलभूत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या समस्या जैसे थेच आहेत. विविध प्रमुख पक्षांच्या स्वबळावर लढण्याच्या निणर्यामुळे गावपुढाऱ्यांची गोची झाली आहे. प्रचाराला केवळ सहा दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. प्रत्येक उमेदवार स्वत: किती चांगले आणि इतर पक्ष किती वाईट, हेच सांगत सुटले आहेत. मात्र, आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरी झडत असताना गावागावांतील मूलभूत समस्या मात्र अद्यापही जैसे थेच आहेत. अलीकडे मतदारही दूधखुळे राहिलेले नाहीत. ते दारात मत मागण्यासाठी आलेल्या उमेदवाराला ‘आधी विकासाचे बोला, मतांचे नंतर बघू’ असे खडे बोल सुनावत आहेत. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात ५३ उमेदवार रिंगंणात आहेत. महायुती, आघाडी तुटल्यानंतर राजकीय वातावरण बदलले. स्वपक्षात उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी अन्य पक्षांचा झेंडा हाती घेतला. या नवख्या उमेदवारांसाठी पक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समस्यादेखील नव्याच आहेत. या अवघड परिस्थितीत मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. प्रत्येक मतदारसंघात एमआयडीसी आहे. मात्र, उद्योग नाहीत, रस्ते नाहीत. दर्जेदार शिक्षण, शेतमालावर आधारित उद्योग, पाणीटंचाई, भारनियमन यांसह अनेक मूलभूत समस्या जैसे थे आहेत. यंदा स्वबळावर निवडणूक लढविली जात असल्याने उमेदवारांची भाऊगर्दी आहे. हे उमेदवार मतदारांना आश्वासन देत आहेत. मात्र, मूलभूत समस्यांनी ग्रासलेले मतदार उमेदवारांना खडे बोल सुनावत आहेत. (प्रतिनिधी)
आधी विकासाचे बोला; मतदारांचा सवाल
By admin | Updated: October 8, 2014 23:21 IST