जिल्हाधिकारी यांचे निर्देश : तपासणी पथकात दोन शेतकऱ्यांचा समावेश भंडारा : बोगस व निकृष्ठ बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाने नियमानुसार व काटेकोरपणे तपासणी करावी. तसेच या तपासणीमध्ये दोन शेतकऱ्यांना साक्षीदार म्हणून समाविष्ट करण्यात यावे. दोषी आढळणाऱ्या कृषी केंद्रावर कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले आहेत.कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा कृषि विस्तार अधिकारी एस.एस. किरवे तसेच सर्व पंचायत समिती कृषि विस्तार अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात एकूण ४८२ कृषि केंद्र, ६८६ खत केंद्र आणि ४३२ दुकानांमध्ये किटकनाशके विक्रीसाठी ठेवण्यात येतात. यापैकी १९० कृषि केंद्र, २०९ खते आणि १२७ किटकनाशकांच्या दुकानांची भरारी पथकाने तपासणी केली. यामध्ये ६ दुकानांचे परवाने रद्द करण्याची शिफारस केली असून १२ दुकानांना दोषी आढळलेले बियाणे व खते विक्री बंद करण्यास नोटीस दिली आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात धान लागवडीसाठी ३३ हजार २०० क्विंटल बियाण्यांची मागणी केली असून त्यापैकी १८ हजार ६७७ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. तसेच तुर ६५० क्विंटल मागणी आणि सोयाबिन ३८०० क्विंटलची मागणी आहे.त्याचबरोबर ८९ हजार ८३५ मेट्रीक टन खताची मागणी असून त्यापैकी ७४ हजार ४०० मेट्रीक टन मंजूर असून १६ हजार ८०६ मेट्रीक टन साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात ५० टक्के मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप झाले आहे. मृद आरोग्य पत्रिकेनुसारच शेतकऱ्यांनी खतांचा वापर करावा आणि दुकानदारांनी तीच खते शेतकऱ्यांना विकावित. त्यांच्या फायद्यासाठी कोणतीही खते शेतकऱ्यांना विकू नयेत. तसेच खतांचे लिंकींग करु नये, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना दिलेत. खत व बियाण्यांचे घोषित केलेले कंपनीनिहाय दर शेतकऱ्यांना कळवावेत. त्यासाठी कृषी केंद्रावर त्याची माहिती उपलब्ध असावी. स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण केंद्राची माहिती सर्व लोकप्रतिनिधींना द्यावी. तसेच तक्रार निवारण केंद्राचा टोल फ्री क्रमांक सर्व शेतकऱ्यांना एस.एम.एस.द्वारे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कळवावा, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. (नगर प्रतिनिधी)
सदोष कृषी केंद्रावर कडक कारवाई करा
By admin | Updated: June 10, 2016 00:56 IST