प्रकरण बालकाच्या मृत्यूचे : अतिक्रमण हटविण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासनअड्याळ : अपघाताला कारणीभूत ठरत असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे. राजरोसपणे धावणाऱ्या काळी-पिवळी वाहनांचा थांबा बसस्थानक परिसराच्या दूर ठेवण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी शनिवारी, अड्याळ कडकडीत बंद ठेवण्यात आला. या बंदला अड्याळ वासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार यांना देण्यात आले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता.येथील बसस्थानकात परिसरात अनेक समस्या आहेत. राज्यमार्गाच्या कडेला अतिक्रमण करून दुकाने थाटलेली आहेत. पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावर ठेवण्यात येते. वाहतूक नियंत्रक नसल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच फावते. प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. बसस्थानक परिसरात यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत. त्यानंतरही ग्राम, पोलीस प्रशासन जागे झाले नाही. प्रशासन जागृत असते तर राम अनिल पोपट या आठ वर्षीय बालकाचा जीव वाचू शकला असता. भरधाव ट्रकच्या धडकेत या बालकाचा मृत्यू झाला. नागरिकांनी एकच संताप व्यक्त करून बंदचे आयोजन केले. ग्रामीण रुग्णालय ते किटाडी फाटा येथील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, बसस्थानकावर कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियंत्रकाची नियुक्ती करण्यात यावी, काळी-पिवळीचा थांबा बसस्थानकापासून दूर देण्यात यावे, पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची वेळीच दखल घेण्यात यावी, अशी मागणी आहे. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार एन.पी. कांबळे यांना देण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक, उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
अड्याळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: April 24, 2016 00:43 IST