लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात उन्हाळी धानाची खरेदी सुरू होवून तब्बल महिना झाला तरी पणन कार्यालयाच्या नियोजनाअभावी खरेदी रखडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ केंद्रावर केवळ एक लाख १७ हजार २९० क्विंटल धानाची खरेदी झाली. उलट लगतच्या गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत सहा लाख क्विंटल धानाची खरेदी झाली. पाऊस सुरू होण्यापुर्वी ही खरेदी झाली नाही तर शेतकऱ्यांना धान खासगी व्यापाऱ्यांना विकल्याशिवाय पर्याय राहणार नाही.भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. यावर्षी खरीप हंगामात ऐन काढणीच्यावेळी अवकाळी पावसाचा फटका धान पिकाला बसला. त्यामुळे त्यातून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड केली. जिल्ह्यात तब्बल २२ हजार ९९१ हेक्टर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. योग्य हवामान आणि शेतकऱ्यांच्या परिश्रमाने उन्हाळी धानाला चांगला उतारा आला. मात्र आता हा धान विकण्यासाठी खरीपासारखीच शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.भंडारा जिल्ह्यात १ मे पासून धान खरेदी केंद्राला प्रारंभ झाला. परंतु स्थानिक पणन कार्यालयाच्या नियोजनाअभावी सुरूवातीला काही मोजक्याच केंद्रावर धान खरेदी सुरू झाली. मे महिन्याच्या अखेरीस ४२ केंद्र सुरू करण्यात आले. परंतु कोणतेही नियोजन नसल्याने आतापर्यंत या ठिकाणी केवळ एक लाख १७ हजार २९० क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. लगतच्या गोंदिया जिल्ह्यात महिनाभरात सहा लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. खरीप हंगामात गोंदिया जिल्ह्यातून दीड लाख टन तांदळाची उचल करण्यात आली. गोंदियात शक्य होते ते भंडाऱ्यात का नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मृगनक्षत्र सुरू झाले असून पाऊस केव्हाही बरसण्याची शक्यता आहे. एकदा जोरदार पाऊस सुरू झाला की, धान खरेदी ठप्प होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना आपल्या जवळील धान खाजगी व्यापाऱ्यांना विकल्याशिवाय पर्याय राहणार नाही. यातून शेतकºयांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होण्याचीही शक्यता आहे.बोनसची प्रतीक्षाखरीप हंगामात विकलेल्या धानाच्या बोनसची अद्यापही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. आता नविन खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु असून बी-बियाणे व खते खरेदीसाठी पैशाची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनसची रक्कम तात्काळ द्यावी, अशी मागणी आहे.खरिपातील धानानेच गोदाम हाऊसफुल्ल- खरीप हंगामातील खरेदी झालेला धान भरडाईसाठी पूर्ण क्षमतेने उचलण्यात आला नाही. आजही जिल्ह्यात १० लाख क्विंटल खरीपातील धान भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. तांदूळाची उचल झाली नाही त्यामुळे भरडाई रखडली आणि परिणामी गोडावून हाऊसफूल्ल आहेत. त्यामुळे उन्हाळी धान खरेदी केल्यावर तो ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक पणन कार्यालयाने योग्य नियोजन केले असले तर उन्हाळी धान खरेदी आतापर्यंत संपली असती.बारदान्याचा तुटवडाकोरोना संकटामुळे बारदाना उद्योगाला मोठा फटका बसला. बारदाना तयार करण्यासाठी मजूर नसल्याने जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदीसाठी बारदान्याचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. पणन कार्यालयाने बारदान्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. याचा परिणामही जिल्ह्यातील खरेदीवर झाला आहे.
पणन कार्यालयाचा कारभार हाताबाहेरभंडारा जिल्हा पणन कार्यालयाचा कारभार खरीप हंगामातील धान खरेदीपासूनच हाताबाहेर गेल्याचे दिसत आहे. जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेचा परिणाम खरेदीवर होत आहे. धान भरडाईचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. वेळीच धानाची भरडाई झाली असती तर बाहेर जिल्ह्यातील मिलर्सला भरडाईसाठी धान देण्याची वेळही आली नसती. परंतु पणन अधिकारी आपले हात वर करताना दिसतात. संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते कधीच फोन स्वीकारत नाही. एकंदरीत येथील कार्यालय रामभरोसे झाले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याकडे जिल्ह्यातील कुणाचेही लक्ष नाही.