आंदोलनाचा इशारा : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणीकरडी (पालोरा) : धानाचे उत्पादन कीड व रोगांमुळे ५० ते ६० टक्के घटले आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून पडत्या भावात खरेदी सुरु असून फसवणूक व लुबाडबूक होत आहे. त्वरीत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे, मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस मोहाडी तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.जिल्ह्यात १ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक घेतले जात असून मोहाडी तालुक्याचे क्षेत्र ३२ हजार हेक्टरच्या घरात आहे. तालुक्यात हलके धान मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याचबरोबर सिंचनाची सोय असलेले शेतकरी भारी धानाची फसल घेतात. यावर्षी या दोन्ही पिकांवर रोगराईचे सावट निर्माण झाले. उभ्या धानाचे पीक लोंबीविना वाळून तण झाले. तुडतुडा, सावरदेवी, गादमाशी, लष्करी अळी व विविध रोगांनी हाती आलेले पीक हिसकावून घेतले. शेतात कीड व रोगांमुळे धानाला उग्र वास येत आहे. जनावरेही वाळून तण झालेली तणस खायला तयार नाहीत. अशी वाईट अवस्था आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणीलाही पडवत नसल्याने धान शेतात उभेच ठेवले आहे. तर काहींनी उभ्या धानाला आग लावली आहे. नागरटी, बियाणे, खते, औषधी, पेरणी व रोवणीचा खर्च, मजुरी, कापणी व मळणीचा खर्च लक्षात घेता, त्याचबरोबर दोन ते तिनदा पंपाने पाणी देण्याचा खर्च एकरी २० ते २२ हजारांचे वर गेले आहे. परंतु उत्पन्न मात्र अत्यल्प आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना तर एकही उत्पादन हाती मिळाले नाहीत. ५० ते ६० टक्के उत्पादनात घट असल्याचे मळणीवरून दिसून येत आहे. करडी परिसरात सुद्धा अत्यंत वाईट स्थिती आहे. धानाचे भाव पडले असताना अजूनही धान खरेदी केंद्र सुरु झालेले नाहीत. आ.चरण वाघमारे या विषयावर मौन धारण करून आहेत. खोटे आश्वासन व जुमलेबाजीने फसवणूक करीत निवडून आलेले सरकार व त्यांचे आमदार, खासदार शेतकऱ्यांच्या जखमांवर मिठ चोळीत उद्घाटनात व्यस्त आहेत.निदान काळा धानाचा पैसा प्रती शेतकरी १५ लाख रुपये देऊन शासनाने आश्वासनाची पूर्ती करावी, महागाई आटोक्यात आणावी, धानाला भाव द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे मोहाडी तालुकाध्यक्ष वासुदेव बांते, पं.स. सदस्य महादेव पचघरे, सरपंच किशोर माटे, लिलाधर कांबळे, उपासराव गाढवे, वामन राऊत, भगवान आगाशे, महादेव फुसे, अमरकंठ लांडगे, सुरेश बिसने, कवळू मुंगमोडे, सरपंच भूपेंद्र पवनकर, सुंदरबाई मुंगमोडे, राजधर शेंडे, वामन चकोले, भगवान तिजारे, संजय भोयर, नरेश ईश्वरकर, कार्तिक ईश्वरकर, हरिभाऊ शेंडे यांनी केली आहे. धान खरेदी केंद्र त्वरीत सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली आहे. आमदार व खासदार महोदयांनी त्वरीत निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. (वार्ताहर)
धान केंद्र तत्काळ सुरू करा
By admin | Updated: November 13, 2015 00:54 IST