भंडारा : लाखनी तालुक्यातील मुंडीपार शिवारात भेल कारखान्याच्या उद्घाटनाला दोन वर्ष पूर्ण झाले असले तरी अद्यापही बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही. भेल कारखाना तातडीने सुरु करा. अन्यथा शेतकऱ्यांच्या जमीनी परत करा, अशी मागणी भेल बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनानुसार १४ मे २०१५ रोजी भेल कारखान्याला दोन वर्ष पुर्ण झाले आहे. कारखाना सुरु करण्यासाठी समितीने अनेकदा केंद्रासह राज्यशासनाला तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदने दिली. प्रसंगी मोर्चे, महाधरणे करुन शासनाचे लक्ष ेवेधण्यात आले. मात्र कारखाना अद्यापही सुरु झालेला नाही. भेल, सौर ऊर्जा प्रकल्प, लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे प्रकल्पाचे काम सद्यस्थितीत बंद पडले आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हजारो बेरोजगार युवकांचा व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार मिळण्याच्या स्वप्नांचा अपेक्षा भंग झालेला आहे. सदर कारखाना दोन वर्षात पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले होते. केंद्र व राज्यामध्ये बहूमताची सत्ता आलेली आहे. यामुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र कारखाना सुरु करण्याचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नसल्यामुळे बेरोजगारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारच्या २०१३ च्या भूसंपादन कायद्यांतर्गत दोन वर्षात प्रकल्प सुरु करण्याबाबत कुठल्याच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा जमीनी परत करा. अन्यथा भेल बचाव संघर्ष समितीच्या वतीने लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल. अशा इशारा निवेदनात नमूद केला आहे. निवेदनावर समितीचे अध्यक्ष अचल मेश्राम, मुख्य निमंत्रक जिल्हा परिषद सदस्य विजय खोब्रागडे, अशोक मेनपाले, कमलाकर चुटे, संतोष पुराम, गीता चवळे, कल्पना भलावी, पौर्णिमा फुलेकर, मदन द्रुगकर, बाळा शिवणकर, वामन वैद्य, श्रीराम बोरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (नगर प्रतिनिधी)
'भेल' सुरु करा, अन्यथा शेतजमिनी परत करा
By admin | Updated: May 16, 2015 01:07 IST