भंडारा : वीज बचत व विद्युत पुरवठ्याच्या कारणावरून ग्रामपंचायत स्तरावर गावात सौरदिवे लावण्यात आले. शहरापासून खूप आत असलेल्या गावांना याचा विशेष फायदा झाला. पायवाटा प्रकाशमान झाल्या. परंतु बॅटरीच्या सुरक्षेचा अभाव राहिल्याने अल्पावधीतच गावातील सौरदिवे आणि त्यातील बॅटरी अज्ञातांनी चोरून नेल्याने हे सौरदिवे सध्या कुचकामी ठरत आहेत. तसेच यातील बिघाड दुरुस्त करण्याचीही व्यवस्था नसल्यानेही ते निकामी ठरत आहेत. पंचायत समितीतील ग्रामपंचायत स्तरावर गावांना सौरदिव्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक गावातील लोकसंख्या लक्षात घेऊन वॉर्डनिहाय सौरदिवे लावण्यात आले. सौरदिव्यांच्या खांबावर सौर बॅटरीचीही व्यवस्था करण्यात आली. परंतु काही महिन्याच्या कालावधीतच काही ठिकाणी सौर बॅटऱ्यांची अज्ञातांकडून चोरी व्हायला लागली. तर अनेक ठिकाणी यात तांत्रीक बिघाड आला. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये प्रमुख चौकात, नवीन वस्त्यात त्याचबरोबर ज्या वॉर्डामध्ये विद्युतची सुविधा नाही अशा ठिकाणी सौरदिव्यांची उभारणी करण्यात आली. मात्र संधीचा फायदा घेत अज्ञाताकडून बॅटऱ्यांची चोरी करण्याचा सपाटा सुरु झाला. त्याचप्रकारे अनेक सौरदिव्यांमध्ये तांत्रिक बिघाड आला. तो दुरुस्त न केल्यानेही गावांमध्ये भर चौकात अंधार पहावयास मिळत आहे. शासनाने ग्रामीण भागात सौरदिवे लावल्याने वारंवार खंडीत वीज पुरवठ्याचा कुठलाही फरक ग्रामस्थांना पडत नव्हता. अनेक सौरदिवे भर पावसातही लाईन गेल्यावर सुरु असायचे. अनेक गावात व्यवस्थित वीज पुरवठा आजही होत नाही. अशा ठिकाणी हे सौरदिवे खूपच फायद्याचे ठरत होते. परंतु बिघाड आणि चोरी या कारणाने एक चांगली व्यवस्था कुचकामी ठरू पाहत आहे. यातील बिघाड दुरुस्तीसाठी वरिष्ठांना सांगणे गरजेचे आहे. परंतु तसे होत नसल्याने गावामधील सौरदिवे कुचकामी ठरत आहे. (नगर प्रतिनिधी)
गावांमधील सौरदिवे ठरताहेत कुचकामी
By admin | Updated: October 28, 2014 22:53 IST