३० हेक्टर शेतजमीन कोरडवाहू : कालवा पूर्ण करण्याची मागणीपवनी : गोसीखुर्द (इंदिरासागर) धरणाच्या उजव्या कालव्यामुळे पवनी तालुक्यातील शेकडो हेक्टर कोरडवाहू शेतजमीन सिंचनाखाली आलेली असताना त्याच कालव्यापासून काढण्यात आलेले लघु कालवे अपूर्णावस्थेत असल्याने रेवनी भोजापूर येथील शेतकऱ्यांची ३० हेक्टर शेती कोरडवाहू राहिलेली आहे. तसेच अपूर्ण कालवा पावसाळ्यात शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. धानाचे पिकात पाणी साचून राहिल्याने कित्येक शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षात दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अपूर्ण लघुकालवा पूर्ण करावा अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.उजव्या कालव्यापासून रेवनी भोजापूर लघु कालवा एमएल२ सर्व्हेनुसार रानपौना पांदन रस्त्यापर्यंत पूर्ण करावयाचा होता. सर्व बाधीत शेतकऱ्यांना जमीनचा मोबदला देण्यात आला. परंतु मोबदला घेऊन एका शेतकऱ्याने नहराचे काम अडविले. त्यामुळे त्यापुढचे कालव्याचे काम अपूर्ण राहिले. लघु कालवा अपूर्ण राहिल्याने त्यामुळे पाणी पोहचू शकत नाही. हा कालवा रानपौना पांधण रस्त्यापर्यंत पूर्ण केल्यास परिसरातील ३० हेक्टर शेती ओलीताखाली येणार आहे. सद्यस्थितीत पूर्ण शेती कोरडवाहू असल्याने खरीप पिकाशिवाय अन्य पीक शेतकरी घेऊ शकत नाही. खरीप पिकाचे वेळी नहरात (कालव्यात) सोडलेले पाणी आजूबाजूचे शेतात साचून राहिल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी लघु कालवा एमएल २ चे काम पूर्ण करावे अशा आशयाचे निवेदन नकटू वैद्य, चिंधू वैद्य, तिकवडू मंडपे, चोखोबा मंडपे, हेमराज मंडपे, हरिदास मंडपे, तुरसा चहांदे, व्यंकट मंडपे, शंकर वैद्य व अन्य शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता उजवा कालवा विभाग क्र. १ यांच्याकडे दिलेला आहे. (तालुका प्रतिनिधी)
लघु कालव्याच्या अपूर्णावस्थेचा फटका
By admin | Updated: April 29, 2015 00:35 IST