विशाल रणदिवे ल्ल अड्याळ विदर्भात घोड्याची यात्रा म्हणून प्रख्यात असलेल्या अड्याळ येथील यात्रा महोत्सवात यावर्षी सर्वधर्मिय विवाह सोहळ्यात सहा जोडपी विवाहबद्ध होणार आहे. सामूहिक विवाह सोहळ्यापूर्वी पहाटे ४ वाजतापासून हनुमान जन्मोत्सव, ८ वाजता सुंदरकांड, १२ वाजता सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.घोडायात्रानिमित्ताने १५ दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री बालाजी रथयात्रा, भागवत सप्ताह श्रीरामनवमी उत्सव, हनुमान जयंती उत्सव आयोजित करण्यात आले होते. या घोडायात्रेला विदर्भातील लाखो भाविकांनी हनुमंताचे दर्शन घेतले. या यात्रेचा भाग म्हणून अड्याळ येथे १९९६ पासून विवाह सोहळ्याची परंपरा वाजत गाजत सुरू असून गेल्या २० वर्षापासून ग्रामविकास एकात्मता समितीच्यावतीने आजपर्यंत ३४६ जोडपे विवाह बंधनात अडकले.विवाह सोहळ्याप्रसंगी खासदार नाना पटोले, माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, दुध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, जिल्हा परिषद सदस्य युवराज वासनिक, माजी उपसभापती शिवशंकर मुंगाटे, डॉ.भैय्यामोहन क्षीरसागर, हनुमान मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्करराव पोटवार, मधुकर निकुरे, देविदास नगरे उपस्थित राहतील. यावेळी अतिथींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विवाह सोहळ्यातील नवदांपत्यांना अड्याळ ग्रामपंचायत, अड्याळ पोलीस ठाणे, हनुमान मंदिर देवस्थान समितीकडून गृहउपयोगी वस्तु भेट देण्यात येणार आहेत. यावेळी किशोर देवयीकर महाराज, अशोक सलुजा, सुर्ववंशी महाराज व मुनेश्वर बोदलकर उपस्थित राहणार आहेत. या सात दिवस चालणाऱ्या महायज्ञात हभप विलास लिल्हारे महाराज यांचे दैनंदिन प्रवचन या सप्ताहात पर्वनी ठरली. तसेच सातही दिवस हनुमान मंदिरात महिला मंडळातर्फे सुंदरकांड, ग्रामसफाई, भजन जागरण, काकड आरती, हरिपाठ, घटस्थापना आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)
सर्वधर्र्मीय विवाह सोहळ्यात सहा जोडपी विवाहबद्ध होणार
By admin | Updated: April 22, 2016 01:59 IST