रवीन्द्र चन्नेकर - बारव्हावर्षभर शेतात राबराब राबायचे, शेतीसाठी बँक, बचत गट, सहकारी संस्था, सोसायटी आणि वेळप्रसंगी सावकाराकडून कर्ज घ्यायचे. त्यातून शेती पिकवायची. हाती येणाऱ्या उत्पन्नातून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवायचा, असा जीवनाचा गाडा हाकणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी मात्र निसर्गाने चांगलाच फटका दिला. दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक बोझा वाढत आहे. त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांनी आता कवडीमोल भावात गोधन विक्रीला काढले आहे.पशुपालकाचा सखासोबती असलेल्या ठवळ्या-पवळ्याची जोडी असो व अन्य पशुधनाची विक्री तई, सानगडी बैल बाजारात केली जात आहे. बारव्हा परिसरातील ३५ ते ४० गावातील काही शेतकरी आपले पशुधन कसायाच्या हवाली करीत आहेत. धान, ऊस उत्पादक म्हणून लाखांदूर तालुक्याची ओळख आहे. या परिसरात यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना पुरते हतबल केले. मागील काही वर्षापासून निसर्गाच्या वृष्ट्रचक्रात शेतकरी व पशुपालक अडकला आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली तो पुरता दबल्या गेला आहे. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगाम पावसाअभावी हातून गेला. निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जाता यावे म्हणून बँक, सावकार, बचत गट व हात उसणवारीच्या, कर्जाच्या परतफेडीसाठी खरीप हंगामानंतर शेतकरी व पशुपालकांनी आपले पशुधन विक्रीला काढले आहे. पशुधन विकले नाही तर आपल्यावर कर्जाचा डोंगर वाढत जाईल. या भीती शेतकऱ्यांना आहे. पुढील रब्बी हंगामाचीही आशा मावळली आहे. त्यामुळे चाऱ्याचीही भीषण टंचाई होणार, या भीतीपोटी पशुपालक, शेतकऱ्यांनी पशुधन विक्रीचा निर्णय घेतला आहे.लाखांदूर तालुक्यातील अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. आधुनिक संयंत्रामुळे सर्वत्र ट्रॅक्टरने नांगरणी व मळणी यासोबत शेतीची अनेक कामे ट्रॅक्टरने केली जाते. त्यामुळे बैलांनाही आता कामे उरली नाहीत. अशाही स्थितीत शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकटासोबत आधुनिक यंत्रांनी संकट निर्माण केले आहे. शेतीकामात मोठ्या प्रमाणावर आधुनिक संयंत्राचा वापर होत असल्याने पशुधन निकामी ठरत आहे.
कर्जमुक्तीसाठी गोधन विक्रीला!
By admin | Updated: January 28, 2015 23:10 IST