भंडारा : उन्हाळी धानपिक डौलात उभे असण्याच्या काळात ग्रामीण क्षेत्रातील शेतकऱ्यांवर भार नियमनाची कुऱ्हाड कोसळली आहे. कुठे १६ तर कुठे ४ तासांचे भारनियमन करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे वीज बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीने वीज जोडणी कापण्याचा सपाटा सुरु केला आहे. पवनी, लाखांदूर यासारख्या चौरस पट्यात जवळपास २५ हजार कृषीपंप आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानसह कठान मालाचे उत्पादन घेतले जाते. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना कृषि पंपाचा मोठा आधार आहे. मात्र थ्री फेस व सिंगल फेस योजना असलेल्या भागात १० ते १६ तासांचे भारनियमन केले जात आहे. यात सावरला, गोसे, भावड, कोंढा, पिंपळगांव, विरली, पालोरा, तुमसर तालुक्यातील सिहोरा, बपेरा, चांदपूर, मोहाडी तालुक्यातील चिचखेडा, पार्डी, मोहाडी या फिडर अंतर्गत ८ ते १६ तासांचे भारनियमन होत आहे. तसेच भंडारा तालुक्यातील पहेला, वाकेश्वर, ढोलसर, मोहाडी तालुक्यातील आंधळगांव, ढोल, करडी, बेटाळा, पवनी तालुक्यातील मांगली, कोंढा, लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर, खैरी, साकोली तालुक्यातील सौंदड, विरली गावठाण, गोंडउमरी, किरमटी, वडद, सातलवाडा, लाखनी तालुक्यातील पोहरा, रेंगेपार, पटाचिटोली, लाखोरी, एकोडी, बोदरा, राजेगांव, सालेभाटा, मुरमाडी फिडरमध्ये भारनियमन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
ग्रामीण भागात भारनियमनाची ‘कुऱ्हाड’
By admin | Updated: January 12, 2015 22:44 IST